LMOTY 2026: महाराष्ट्रासमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं? आमिर खानच्या प्रश्नावर CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं गंभीर उत्तर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 21:23 IST2026-03-10T21:15:13+5:302026-03-10T21:23:37+5:30
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स कार्यक्रमात अभिनेता आमिर खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

LMOTY 2026: महाराष्ट्रासमोर सर्वात मोठं आव्हान कोणतं? आमिर खानच्या प्रश्नावर CM देवेंद्र फडणवीसांनी दिलं गंभीर उत्तर!
CM Devendra Fadnavis Speech, Lokmat Maharashtrian of the Year awards 2026: महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चिला जाणारा बहुप्रतिक्षित लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स २०२६ हा सोहळा मंगळवारी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया येथे पार पडला. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अभिनेते आमिर खान, विकी कौशल यांसह राज्यभरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या महाराष्ट्रासमोरील सर्वात मोठ्या आव्हानांबद्दल भाष्य केलं.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर अवॉर्ड्स कार्यक्रमात अभिनेता आमिर खानने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. यावेळी अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. आमिर खानने यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना सध्या महाराष्ट्रासमोर सध्या कोणतं मोठं आव्हान आहे असं विचारलं. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेती आणि हवामान बदल हे सध्याचे महाराष्ट्रासमोरील मोठे प्रश्न असल्याचे म्हटलं.
"आज महाराष्ट्रासमोर सर्वात मोठे आव्हान हवामान बदलाचे आहे. याचा थेट परिणाम आपल्या शेतीवर होत आहे. आपल्या राज्यातील ४५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे आणि हवामान बदलाचा सर्वाधिक फटका त्यांनाच बसतो. गेल्या वर्षी पिके खूप छान आली होती, परंतु अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. परिणामी, शेतीचा विकासदर थेट चार टक्क्यांवर खाली आला. यावर्षीचे सर्व हवामान अंदाज एल निनोच्या प्रभावाबाबत सांगत आहेत. त्यामुळे आपल्याला आता हवामान-रोधक आणि हवामान-सज्ज शेतीकडे वळावे लागेल," असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
"गेल्या काळात आपण जलसंधारणाबाबत जे काम केले, त्याचा फायदा असा झाला की, आज ८५ टक्के पाऊस झाला तरी आपण शेती वाचवू शकतो. पूर्वी ९५ टक्के पाऊस होऊनही अनेक ठिकाणी दुष्काळ पडायचा, ती स्थिती आता बदलली आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन आपल्याला आता अशी बियाणे विकसित करावी लागतील, जी पावसाला उशीर झाला तरी तग धरतील. दोन पावसांमध्ये २५ दिवसांचे अंतर पडले, तरी ही बियाणे टिकली पाहिजेत. या सर्व गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्राच्या विकासामध्ये हवामान बदल आणि शेती हीच सर्वात मोठी आव्हाने आहेत," असेही मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितले.