प्रोजेक्ट टायगर उपक्रम झोकात सुरू असताना राज्यात वर्षभरात तब्बल ४१ वाघ मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 19:43 IST2026-02-26T19:43:19+5:302026-02-26T19:43:19+5:30
मुंबई : राज्यात संपलेल्या २०२५ या वर्षात विविध कारणांमुळे ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत ...

प्रोजेक्ट टायगर उपक्रम झोकात सुरू असताना राज्यात वर्षभरात तब्बल ४१ वाघ मृत्युमुखी
मुंबई : राज्यात संपलेल्या २०२५ या वर्षात विविध कारणांमुळे ४१ वाघांचा मृत्यू झाल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. मृत्युमुखी पडलेल्या वाघांमध्ये एक, दोन नव्हे तर ८ वाघांचा अपघातात बळी गेला आहे. विजेचा धक्का बसून चार वाघ आणि एका वाघाची तर शिकारच झाल्याचे नमूद केले आहे. २८ वाघांचा मृत्यू मात्र नैसर्गिक झाला आहे. वाघांचे मृत्यू रोखण्यासाठी शासन काय पावले उचलत आहे, असेही विचारण्यात आले होते.
रेल्वे अपघात चिंताजनक
मृत्यू रोखण्यासाठी नव्याने प्रस्तावित वन्यप्राण्यांचे रेल्वे अपघातात होणारे रेल्वे मार्गावरील जंगलामध्ये वन्यप्राण्यांना ये-जा करण्यासाठी अंडरपास तसेच ओव्हरपास तयार करणे, या क्षेत्रात रेल्वेचा वेग ताशी ४० किमी ठेवणे आदी उपाययोजना करण्याच्या सूचना रेल्वेला केल्या आहेत. शिकार रोखण्यासाठी विशेष व्याघ्र संरक्षण दलातील पथकामार्फत नियमित गस्त, शिकाऱ्यांची माहिती मिळविण्यासाठी परिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांच्य नेमणुका, अतिसंवेदनशील क्षेत्रात बिनतारी संदेश यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
नाक्यांवर होते तपासणी
अतिसंवेदनशील क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी तपासणी नाके तयार करण्यात आले असून त्याद्वारे येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची नियमित तपासणी करण्यात येते. परिक्षेत्र स्तरावर वाघ, बिबट्या आदी वन्यप्राण्यांच्या मागोव्याचा पंधरवडी कार्यक्रम राबवून त्यांच्या अस्तित्वाबाबतची माहिती घेण्यात येते.
वाघांचे भ्रमणमार्ग, पाणवठे व महत्त्वाच्या ठिकाणी कॅमेरा ट्रॅप लावून संशयास्पद हालचालींवर पाळत ठेवण्यात येते तसेच पाण्यामध्ये विष प्रयोग होऊ नये म्हणून पाणवठ्याची नियमित तपासणी केली जात असल्याचेही नाईक यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.