मे महिना प्रारंभ, तरी मुंबईत नालेसफाई अर्ध्यावरच; यंदाचे उद्दिष्ट कसे गाठणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:05 IST2026-05-05T13:04:20+5:302026-05-05T13:05:18+5:30
विक्रोळी, भांडुप कामामध्ये तळाला, अवघी ९ टक्के कामेच पूर्ण; प्रशासनावर मोठे प्रश्नचिन्ह

मे महिना प्रारंभ, तरी मुंबईत नालेसफाई अर्ध्यावरच; यंदाचे उद्दिष्ट कसे गाठणार?
मुंबई : मे महिना उजाडला तरी मुंबईतील नालेसफाईची कामे अजून निम्मी ही झाली नसल्याचे समोर आले आहे. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरांमध्ये ३ मेपर्यंत मोठ्या नाल्यांची एकूण ४५.५६ टक्केच नालेसफाई पूर्ण झाली आहे. त्यातही मिठी नदीच्या सफाईचा टक्का त्याहून कमी म्हणजे अवघा ३१.९१ टक्के इतकाच आहे.
मुंबईतील छोट्या नाल्यांची सफाई ही ५४ टक्के झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. भांडुप, विक्रोळी, कांजूर मार्ग परिसरात तर छोट्या नाल्यांची सफाई फक्त ९ टक्के झाली आहे. चेंबूर, देवनारसारख्या परिसराच्या एम पश्चिम विभागात ही नालेसफाई २५ टक्क्यांवरच आहे. त्यामुळे येत्या ३१ मे आधी पालिका प्रशासन कंत्राटदारांकडून नालेसफाईचे टार्गेट कसे पूर्ण करून घेणार, हा प्रश्न उपस्थित होत आहे. आतापर्यंत एकूण उद्दिष्टापैकी एकूण ४ लाख ३ हजार मेट्रिक टन गाळ उपसा केला आहे. त्यामुळे उर्वरित २६ दिवसांत पालिकेला उरलेल्या ४ लाख २८ हजार मेट्रिक टन गाळ उपशाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागेल.
लहान-मोठ्या नाल्यांसह मिठी नदीतील गाळ काढणार
महापालिकेच्या यंदाच्या नियोजनानुसार, मोठे नाले, छोटे नाले आणि मिठी नदीतील एकूण ८.४१ लाख मेट्रिक टन गाळ यंदा काढण्यात येणार असून त्यापैकी ३.६७ लाख मेट्रिक टन लहान नाल्यांतून, ३.४१ लाख मेट्रिक टन मोठ्या नाल्यांतून, तर १.३२ लाख मेट्रिक टन मिठी नदीतून काढला जाणार आहे.
मुंबईत नाल्यांचे विस्तृत जाळे असून, २६१.५२ कि.मी. लांबीचे मोठे नाले आणि ४११.५६ कि.मी. लांबीचे लहान नाले आहेत. याशिवाय विविध प्रकारचे नाले मिळून एकूण ड्रेनेज नेटवर्क सुमारे ३,८०० कि.मी. आहे अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.