मुंबईत तब्बल दोन हजार कोटींचे अमली पदार्थ आले कसे? बँकॉक, मलेशियातून विविध मार्गांनी होतेय मोठी तस्करी
By मनोज गडनीस | Updated: April 16, 2026 12:47 IST2026-04-16T12:42:43+5:302026-04-16T12:47:05+5:30
Crime News: गेल्या वर्षी मुंबईत विविध तपास यंत्रणांनी मिळून किमान दोन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ पकडले. अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये वर्षागणिक सातत्याने वाढ होताना दिसत आहे.

मुंबईत तब्बल दोन हजार कोटींचे अमली पदार्थ आले कसे? बँकॉक, मलेशियातून विविध मार्गांनी होतेय मोठी तस्करी
- मनोज गडनीस
मुंबई - गेल्या वर्षी मुंबईत विविध तपास यंत्रणांनी मिळून किमान दोन हजार कोटींपेक्षा जास्त किमतीचे अमली पदार्थ पकडले. अमली पदार्थांच्या विक्रीमध्ये वर्षागणिक सातत्याने वाढ होताना दिसत आहे. ही आकडेवारी केवळ पकडलेल्या अमली पदार्थांची आहे. तर जे अमली पदार्थ पकडले गेले नसतील ती किती असेल, याची कल्पनाही करता येणार नाही. मात्र, यावरून एक निष्कर्ष काढता येईल की दिवसेंदिवस समाजाच्या विविध स्तरांभोवती अमली पदार्थ आपला विळखा घट्ट करीत आहे.
तपास यंत्रणा जसजसा अमली पदार्थांविरोधातला पाश घट्ट करीत आहेत, तसतसे तस्करीचे नवे मार्ग तस्कर शोधत आहेत. बँकॉक, मलेशिया येथून प्रामुख्याने मुंबईत अमली पदार्थ येत आहेत. काही जण बॅगांतून, फळांच्या बॉक्समधून, शरीरात लपवून, अमली पदार्थांच्या गोळ्या गिळून अशा विविध मार्गाने अमली पदार्थ परदेशातून आणत आहेत. तर उत्तर-पूर्वेतील राज्यांच्या लगतच्या सीमेवरूनदेखील देशामध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येत आहेत. ते तिथून रस्तामार्गे देशभरात पसरत आहेत.
लोक या नशेच्या इतके आहारी गेले आहेत की, मध्यंतरी मुंबईत एका व्यक्तीने घराच्या गच्चीमध्ये गांजाची लागवड केल्याचे दिसून आले.
गल्लीबोळांतून मिळतो गांजा अन् कोकेन
गांजा, कोकेन, हेरॉईन, मानसोपचाराची औषधे या अमली पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एक किलो गांजाची किंमत एक कोटी आहे. गांजा व कोकेन या दोन घटकांना मोठी मागणी आहे. जे या नशेच्या विळख्यात आहेत त्यांना गल्लीबोळातून हे अमली पदार्थ मिळतात. मुंबई विमानतळावर तर जवळपास प्रत्येक दिवशी किमान एक ते दोन कारवायांमध्ये अमली पदार्थ पकडले जात आहेत.
एकूण २८६ जणांना अटक
आजच्या घडीला मुंबई पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी पथक, नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो (एनसीबी), केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणा (डीआरआय), सीमा शुल्क विभाग अशा तीन केंद्रीय यंत्रणा सातत्याने अमली पदार्थांच्या विरोधात सक्रिय कारवाई करीत असल्या तरी या यंत्रणांची दमछाक होईल इतक्या प्रमाणात अमली पदार्थ मुंबईत येत आहेत. यावरून नशेच्या विळख्याची तीव्रता लक्षात येते.
प्राप्त माहितीनुसार, गेल्या दीड वर्षात मुंबई विमानतळावर विविध तपास यंत्रणांनी तब्बल १४०७ किलो अमली पदार्थ जप्त केले असून, या प्रकरणी एकूण २८६ जणांना अटक करण्यात आली आहे.