सीएसएमटीला मिळणार अवघे ४० टक्केच पाणी; रेल्वेकडून महापालिकेकडे अतिरिक्त पाण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 09:05 IST2026-05-02T09:05:15+5:302026-05-02T09:05:41+5:30
सध्या पाणीसाठा केवळ २८.३५ टक्के शिल्लक असल्याने ही कपात आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले

सीएसएमटीला मिळणार अवघे ४० टक्केच पाणी; रेल्वेकडून महापालिकेकडे अतिरिक्त पाण्याची मागणी
महेश कोले
मुंबई : वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर बनली असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकाला ३० ते ४० टक्केच पाणीपुरवठा होत असल्याची बाब समोर आली आहे. यामुळे मध्य रेल्वेने मुंबई पालिकेकडे अतिरिक्त पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे. रेल्वे व महापालिकेच्या संयुक्त बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना, सीएसएमटी स्थानकांत प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटीला दररोज २६ लाख लिटर पाण्याची गरज असते. मात्र, सध्या मिळणारा पुरवठा अपुरा असून, उर्वरित पाणी टँकरद्वारे भरावे लागत आहे. त्यामुळे टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी अधिक कनेक्शन देण्याची मागणी रेल्वेकडून करण्यात आली आहे.
यामुळे पाणीकपातीचा निर्णय
महापालिकेने १५ मेपासून शहरात १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पाणीसाठा केवळ २८.३५ टक्के शिल्लक असल्याने ही कपात आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. एल निनोच्या परिणामामुळे पावसावर झालेल्या परिणामामुळे यंदा ही परिस्थिती निर्माण झाली असून, उपलब्ध पाणीसाठा मान्सूनपर्यंत टिकविण्यासाठी खबरदारीची उपाययोजना करण्यात येत असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, तसेच वरिष्ठ महापालिका अधिकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. याशिवाय प्री-मान्सून कामांमध्ये नालेसफाई, मिठी नदी परिसरातील पाणी साचणाऱ्या ठिकाणांवर उपाययोजना, झाडांची छाटणी, ट्रॅक उंचावणे आणि मायक्रो-टनलिंगची कामे १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.