मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
By अनिकेत घमंडी | Updated: May 12, 2026 13:10 IST2026-05-12T13:09:38+5:302026-05-12T13:10:40+5:30
मोटरमन नियमांमुळे प्रचंड त्रस्त असून, सिग्नल मोडला तर काय? याचा मुख्य ताण त्यांच्यावर आहे. मुंबईवरून लोकल सुटल्यानंतर कसारापर्यंत पोहोचेपर्यंत लघुशंकेलाही जाता येत नाही.

मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
-अनिकेत घमंडी, डोंबिवली
मध्य रेल्वेच्या उपनगरी लोकलच्या सुमारे ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच जाच अधिक असल्याने तणावाखाली आहेत. कागदावर सर्व सुखसोयी आहेत; पण प्रत्यक्षात त्या मिळत नसल्याचे मोटरमनच्या संघटनेचे म्हणणे आहे.
मोटरमन नियमांमुळे प्रचंड त्रस्त असून, सिग्नल मोडला तर काय? याचा मुख्य ताण त्यांच्यावर आहे. मुंबईवरून लोकल सुटल्यानंतर कसारापर्यंत पोहोचेपर्यंत लघुशंकेलाही जाता येत नाही. अनेकांना उच्च रक्तदाब, मूतखडा व मूत्रपिंडाशी संबंधित विकार
जडले आहेत.
कोचमध्ये प्रवेश केल्यापासून अनेक नियम लादण्यात आले आहेत. त्यामुळे लोकल धावण्याकडे, वक्तशीरपणाकडे लक्ष द्यायचे, की कागदोपत्री कामे करायची आणि वरिष्ठांना अहवाल देण्याचे दडपण घ्यायचे, असा पेच मोटरमनसमोर आहे.
उपनगरी लोकलचा वक्तशीरपणा कमी झाल्याने कामाचे तास वाढले आहेत. कामाचे तास हा मोठा प्रश्न असून, मोटरमनने जर ‘वर्क टू रूल’ करायचे ठरविले तर किती मोठी समस्या होईल. मात्र, केवळ सर्वसामान्य मुंबईकरांसाठी मोटरमन हे सर्व त्रास सहन करतात आणि सेवा देतात, असे संघटनेचे म्हणणे आहे.
मोटरमनला भेडसावणाऱ्या प्रमुख समस्या...
रोज वहीमध्ये विविध नोंदी भरताना खूप वेळ जातो. दोन स्थानकांमध्ये सिग्नल लागतात. मात्र, लोकल जर चुकून सिग्नलपेक्षा थोडी पुढे गेली तर पेनल्टी होते. नोकरीवरही बेतू शकते. त्याचे दडपण असते.
रोजची वैद्यकीय चाचणी असली तरी त्यामध्ये अनेकांना मधुमेह, हृदयविकार, पचनाचे विकारदेखील जडले आहेत. प्रवाशांना स्थानकात उतरून कुठेही स्वच्छतागृहात जाता येते. परंतु, मोटरमन तसे करू शकत नाही.
विश्रांती स्थान असलेल्या ठिकाणी जायला रात्री-अपरात्री रेल्वे रुळातून मार्ग काढावा लागतो. पावसात तर फार अडचण होते. तेथे सुविधा कमी, असुविधाच अधिक आहेत. त्याबद्दल रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक, महाव्यवस्थापकांना सांगूनही उपयोग झाला नसल्याचे मोटरमन सांगतात.
मध्य रेल्वेवर ८४८ मोटरमन कार्यरत आहेत. या ठिकाणी आणखी १६३ मोटरमन भरती होणे आवश्यक आहे. तर पश्चिम रेल्वेवर ४२० कार्यरत असून ६६ मोटरमन भरतीची आवश्यकता असल्याची माहिती विवेक शिसोदिया यांनी ‘लोकमत’ला दिली.
मोटरमनच्या एक नाही, अनेक व्यथा आहेत. रोज नवनव्या सूचना दिल्या जातात. आधीच मोटरमन प्रचंड तणावाखाली काम करतात. त्यांच्यावर कामाचा मोठा ताण आहे. त्यात नोंदी ठेवण्यापासून वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागतात.
-विवेक शिसोदिया, उपाध्यक्ष, सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, मुंबई मुख्यालय