३५ आदिवासी विद्यार्थ्यांना घडले दिल्ली दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:43 IST2019-05-30T01:43:22+5:302019-05-30T01:43:24+5:30
गरीब व देह विक्रय करणाऱ्या महिला, आदिवासी, एच.आय.व्ही व कॅन्सर पिडीत व त्यांच्या मुलांसाठी मोफत औषधोपचार, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी व सक्षम करत आहे.

३५ आदिवासी विद्यार्थ्यांना घडले दिल्ली दर्शन
मुंबई : भायखळा पश्चिमेकडील सोशल अॅक्टिव्हिटीज इंटिग्रेशन (साई) संस्था दूर्लक्षित, गरीब व देह विक्रय करणाऱ्या महिला, आदिवासी, एच.आय.व्ही व कॅन्सर पिडीत व त्यांच्या मुलांसाठी मोफत औषधोपचार, शिक्षण, व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वावलंबी व सक्षम करत आहे. नुकतेच संस्थेने ३५ आदिवासी विद्यार्थ्यांना पालघर ते दिल्ली असा शैक्षणिक प्रवास घडवून आणला.
पालघर येथील वेती व घोल या दोन जिल्हा परीषदेच्या शाळेतील ३५ आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवनात ज्ञानसंपादन होवून आत्मविश्वास वाढावा आणि त्यांच्या पुढील जीवनात प्रगती व सकारात्मक परिवर्तन व्हावे, या संस्थेच्या उद्देशांना परिपूर्ण करण्यासाठी पालघर ते दिल्ली अशी नुकतीच शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती.
ज्या मुलामुलींना मुंबई शहराचे सुद्धा कधीही दर्शन झाले नाही अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक पाठ्यपुस्तकातील ऐतिहासिक, राजकीय राजधानीतील प्रेक्षणीय व उल्लेखनीय स्थळांचे प्रत्यक्ष दर्शन घडवून आणले गेले. शैक्षणिक सहलीमध्ये १५ मुली, १६ मुले, एक शिक्षक, दोन शिक्षिका, आदींनी सहभाग घेतला. दरम्यान, दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय, लोकसभा, राज्यसभा, कुतूबमिनार, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी स्मारक, नेहरू विद्यापीठ, राष्ट्रपती भवन, इंडिया गेट, अक्षर धाम मंदिर अशा ठिकाणांना विद्यार्थ्यांनी भेटी देऊन ज्ञान संपादन केले.