महामुंबईतील ३० हजार कारखान्यांनी बिघडविले लाखो नागरिकांचे आरोग्य; पर्यावरणीय चिंता वाढली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 05:29 IST2026-04-26T05:29:22+5:302026-04-26T05:29:56+5:30
कल्याणमध्ये सर्वाधिक प्रदूषणकारी कंपन्या; पर्यावरणीय धोक्याची वाढली तीव्रता

महामुंबईतील ३० हजार कारखान्यांनी बिघडविले लाखो नागरिकांचे आरोग्य; पर्यावरणीय चिंता वाढली
महेश पवार
मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईसह ठाणे, कल्याण, नवी मुंबई व रायगड परिसरात कारखान्यांमुळे प्रदूषण वाढत असल्याचे समोर आले आहे. महामुंबईतील मोठे, मध्यम व लहान अशा एकूण ३४,६९६ कारखान्यांपैकी केवळ ४,०५५ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक २० पेक्षा कमी आहे. तर, ३०,६४१ कारखान्यांची प्रदूषण पातळी वाढली असून त्यापैकी ८,५०० कारखान्यांनी अति धोकादायक मानला जाणारा ६० पेक्षा अधिक प्रदूषण निर्देशांक गाठला आहे. यात कल्याण विभागात सर्वाधिक २,६८५ कारखाने प्रदूषणकारक ठरल्याने धोक्याची तीव्रता वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यकक्षेतील १२ विभागांमधील डिसेंबर २०२५ पर्यंतच्या प्रदूषणकारी कारखान्यांची आकडेवारी जाहीर केली. मंडळाच्या अखत्यारीत लहान, मध्यम आणि मोठे असे १,४३,५४८ कारखाने असून त्यापैकी पुणे विभागात सर्वाधिक ३०,६८२ तर त्याखालोखाल कोल्हापूर विभागात २२,९५० कारखाने आहेत. चंद्रपूर विभागात सर्वात कमी २,३८६ कारखान्यांची नोंद आहे. प्रदूषण निर्देशांक ६० पेक्षा अधिक असलेल्या सर्वाधिक मोठ्या कारखान्यांची संख्या पुण्यात २,३०९ आहे. तर प्रदूषण निर्देशांक २० पेक्षा कमी असलेल्या कारखान्यांमध्ये कोल्हापूरने आघाडी घेतली आहे.
७,५६४ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक २१ ते ६० पेक्षा अधिक
महामुंबईत कल्याण विभागातील लहान, मध्यम व मोठ्या अशा ८,८७२ पैकी १,३०८ कारखाने २० पेक्षा कमी प्रदूषण निर्देशांकात आहेत. तर उर्वरित ७,५६४ कारखान्यांचा प्रदूषण निर्देशांक २१ ते ६० वा त्यापेक्षा अधिक आहे. मुंबईतील ७,४३७ कारखान्यांपैकी १,५६० कारखान्यांनी धोक्याचा ६० पेक्षा जास्त प्रदूषण निर्देशांक ओलांडला असून केवळ २३७ कारखान्यांचा निर्देशांक २० पेक्षा कमी आहे. महामुंबईत वाढत्या प्रदूषणामुळे आता पर्यावरणीय चिंता वाढली आहे.