मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी (Usha Nadkarni) त्यांच्या परखड स्वभावासाठी ओळखल्या जातात. मराठीसोबतच त्या हिंदीतही प्रसिद्ध आहेत. गाजलेल्या 'पवित्र रिश्ता' मालिकेतील त्यांची खाष्ट सासूची भूमिका सगळ्यांच्याच लक्षात आहे. या मालिकेची निर्माती एकता कपूरही (Ekta Kapoor) तिच्या रोखठोक स्वभावामुळे ओळखली जाते. दरम्यान एका मुलाखतीत उषा नाडकर्णी यांनी एकतासोबतचा त्यांचा अनुभव सांगितला.
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आजपर्यंत मी एकताकडे कधी गेले नाही. किंवा मी तिला कधी फोन केला नाही. माझा एकही पैसा त्यांच्याकडे राहिला नाही. कारण तिथे चोख पैसे मिळतात. काम करताना मी वर्षभर पैसे घेतले नव्हते. नंतर मी सगळा हिशोब घेऊन गेले होते. तेव्हा त्यांचाही अगदी तोच हिशोब होता आणि त्यांनी मला तेवढे पैसे दिले. त्या बाईचं एक म्हणणं आहे मी सगळं व्यवस्थित देते तर तुम्ही तसं कामही करा. आम्हाला कधीच शिव्या दिल्या नाही. कारण मी कधीही उशिरा गेले नाही, जाताना मला हे नको ते नको केलं नाही. मी साड्याही माझ्या घरुनच घेऊन जायचे. आईच्या साड्या नेल्या होत्या. मी खरे दागिनेही नेले होते. ती बाई माझ्याशी कधी वाईट वागली नाही. कारण मी तिला आयुष्यात कधी चहाड्या सांगितल्या नाही."
त्या पुढे म्हणाल्या, "फक्त मी मालिका सोडत होते तेव्हा तिने मला बोलवलं. तेव्हा मी ठरवून गेले होते की हिने मला शिव्या दिल्या तर मीही माझ्या ठेवणीतल्या सगळ्या बाहेर काढेन. पण ती माझ्याशी इतकं गोड बोलली. पहिल्यांदा मी तिचं ऑफिस बघितलं. मोठं टेबल आणि त्यावर कितीतरी देवाच्या मूर्ती. तिने हात जोडले आणि म्हणाली, 'उषाजी, माझी मालिका सोडू नका. तुम्ही माझ्या मालिकेचा जीव आहात. तुमचे किती चाहते आहेत.' म्हटलं नाही मॅडम मला सोडावी लागणार. मी तिला सगळं सांगितलं. तेव्हा मला म्हणाली, लक्ष देऊ नका."