ज्येष्ठ पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. पावसाळ्यात येणारा पहिला सण म्हणजे वटपौर्णिमा. ज्येष्ठ पौर्णिमेला मोठ्या थाटात स्त्रिया हा सण साजरा करतात. त्यामुळे मालिकेमध्येही या सणाचा उत्साह पाहायला मिळतो. सध्या हाच उत्साह जीव माझा गुंतला या मालिकेत पाहायला मिळत आहे. पहिल्यांदाच अंतरा वटपौर्णिमा साजरी करणार आहे. मात्र, यामध्येही श्वेता मीठाचा खडा टाकणार आहे.
सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून या सर्व सुवासिनी हे व्रत करु लागल्या. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे. कलर्स मराठीवरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेमध्ये अंतराची पहिली वटपौर्णिमा असून खानविलकर कुटुंब मोठ्या उत्साहात ती साजरी करणार आहे. त्यामुळे अंतराने छान हिरव्या रंगाची नऊवारी साडी नेसली, केसात गजरा, पारंपरिक दागिने असला लूक केला आहे. मात्र, या सणामध्ये श्वेता मीठाचा खडा टाकणार आहे.
अंतराची पहिलीच वटपौर्णिमा असल्याने घरात उत्साहाचे वातावरण आहे. पण आता, या आनंदात श्वेता व्यत्यय आणणार आहे. श्वेता मल्हारला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, दुसरीकडे अंतरा चित्रा काकीचा पर्दाफाश करणार आहे. आता हे सगळं कसं घडणार? अंतरा, चित्राचं खरं रूपं सगळ्यांसमोर आणणार का? श्वेता तिच्या कारस्थानात यशस्वी होणार का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.