Tu Hi Re Maza Mitwa Serial Ishwari-Arnav Wedding: गेल्यावर्षी स्टार प्रवाहवर 'तू ही रे माझा मितवा' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. २३ डिसेंबर २०२४ पासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. मालिकेत येणाऱ्या नवनवीन ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन करत आहे. या मालिकेतील अर्णव-ईश्वरी म्हणजेच अभिजीत आमकर आणि शर्वरी जोग ही नवीन जोडीही प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत रंजक वळण पाहायला मिळते आहे. मालिकेत ईश्वरी आणि अर्णव यांचं लग्न झालं आहे.
अर्णवची भूमिका साकारणारा अभिजीत आमकर याने या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. चाहत्यांना उद्देशून तो म्हणाला, "माझ्या सगळ्या IshNav आणि तू ही रे माझा मितवा चाहत्यांच्या आग्रहास्तव... तुमच्यासाठी खास आमच्या लग्नाच्या काही सुंदर क्षणांची झलक. तुमच्या प्रेमासाठी आणि शुभेच्छांसाठी मनापासून आभार. तुमचं प्रेम फक्त कमेंट्समध्येच नाही, तर थेट टीआरपी चार्टवरही झळकतंय. असेच प्रेम करत राहा, आशीर्वाद देत राहा आणि आमच्या प्रवासात सोबत राहा". अभिजीतनं शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे प्रतिसाद दिला आहे.
मालिकेतील ट्रॅकबद्दल...
ईश्वरी आणि अर्णव या दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, योग्य वेळी त्यांनी आपले प्रेम व्यक्त न केल्याने त्यांच्या मार्गात अनेक अडचणी आल्या. अर्णव त्याच्या आजीच्या आग्रहामुळे लावण्याशी लग्न करणार होता, तर घरच्यांच्या दबावामुळे ईश्वरीचे लग्न राकेशशी ठरले होते. पण ही दोन्ही लग्नं होण्याआधी मालिकेत एक मोठा ट्विस्ट आला. राकेश ईश्वरीला घेऊन एका अज्ञात ठिकाणी गेला असताना, तिथे पोलिसांची अचानक रेड पडते. ईश्वरीची बदनामी होऊ नये म्हणून, अर्णव तात्काळ तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि पोलिसांना सांगतो की ती त्याची पत्नी आहे. तू ही रे माझा मितवा ही मालिका रोज रात्री १०.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येते.