उर्मिलाने सोडली मालिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2016 17:56 IST
दुहेरी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या उर्मिला निंबाळकरने या मालिकेला रामराम ठोकला आहे. ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली ...
उर्मिलाने सोडली मालिका
दुहेरी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणाऱ्या उर्मिला निंबाळकरने या मालिकेला रामराम ठोकला आहे. ही मालिका काहीच महिन्यांपूर्वी सुरू झाली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण उर्मिलाने आजारपणामुळे नुकतीच ही मालिका सोडली. याविषयी उर्मिला सांगते, "मला काही दिवसांपूर्वी टायफाइट झाला होता. पण मालिकेत मी मुख्य भूमिकेत असल्याने मला चित्रीकरण करण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे मी काहीच तास चित्रीकरण करत असे. पण पुन्हा चित्रीकरण केल्यामुळे आणि त्यातही काही वेळा मी पावसात भिजल्यामुळे मला सतत ताप भरतच होता. माझी तब्येत पूर्णपणे बरी व्हायला काही दिवसांचा अवधी लागणार होता. त्यात मी काहीच तास चित्रीकरण करत असल्याने टीमचे आर्थिक नुकसानही होत आहे. तसेच मालिकेत अॅक्शन दृश्य पुढील काळात अधिक प्रमाणात चित्रीत केले जाणार आहे. या अवस्थेत अॅक्शन दृश्यांचे चित्रीकरण करणे मला कठीण जाणार याची मला चांगलीच कल्पना होती. या सगळ्यामुळे मी आणि वाहिनीने एकत्रित मिळून हा निर्णय घेतला. आज माझ्यासाठी माझी तब्येत ही महत्त्वाची आहे. माझी तब्येत सुधारल्यानंतर मी चित्रपट, मालिका, नाटकांत काम करू शकेन. दुहेरी ही मालिका, माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप आवडते. तसेच या मालिकेचा टिआरपीही खूप चांगला आहे. त्यामुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय घेणे माझ्यासाठी खूप अवघड होते. पण माझ्या तब्येतीसाठी हा निर्णय मला घ्यावा लागला. माझ्या चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवशी मी खूपच रडले. माझे सहकलाकार निवेदिता जोशी, मैथिली यांच्या डोळ्यांतही अश्रू होते. इतकेच नव्हे तर टीममधील अनेकजण मला निरोप देताना रडले. हीच माझ्या कामाची आणि एक व्यक्ती म्हणून मला माझ्या टीमने दिलेली पावती आहे असे मी म्हणेन."