Join us  

​या कारणामुळे सुधा चंद्रनने नागिन मालिका सोडण्याचा घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 11:24 AM

नागिन 2 या मालिकेत मॉनी रॉय साकारत असलेली शिवांगी प्रेक्षकांना जितकी आवडते, तितकीच प्रेक्षकांना यामिनीची भूमिका साकारणारी सुधा चंद्रनही ...

नागिन 2 या मालिकेत मॉनी रॉय साकारत असलेली शिवांगी प्रेक्षकांना जितकी आवडते, तितकीच प्रेक्षकांना यामिनीची भूमिका साकारणारी सुधा चंद्रनही भावते. या दोघींशिवाय या मालिकेचा कोणी विचारही करू शकत नाही. पण सुधा चंद्रन या मालिकेत साकारत असलेली खलनायिका प्रेक्षकांचे मन जिंकत असतानाच सुधाने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या मालिकेच्या दिग्दर्शकासोबत वाद झाल्यानंतर सुधाने ही मालिका सोडण्याचे ठरवले आहे. याबाबत सुधाने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत ती सांगते, "मी सेटवर असताना पटकथा सतत माझ्या हातात असते यावर दिग्दर्शकाचा आक्षेप आहे. सेटवर मी हातात पटकथा नाही तर काय बीयरचा ग्लास घेऊन फिरू? तसेच सेटवर कलाकारांनी फोन वापरलेलादेखील त्यांना पटत नाही. त्यामुळे मी चित्रीकरणाच्या स्थळी असताना कधीच फोन उचलत नाही." सुधा आणि दिग्दर्शकामधील भांडणे जवळजवळ चार तास सुरू होती. त्यामुळे दिवसाचे चित्रीकरण थांबवावे लागले. शेवटी प्रोडक्शन हाऊसने मध्यस्ती करून पुन्हा चित्रीकरणाला सुरुवात केली. मालिकेचे चित्रीकरण सुरू होण्यापूर्वी सुधा चंद्रन पटकथा वाचत नाहीत. त्यामुळे चित्रीकरणाला अधिक वेळ लागतो असे या मालिकेच्या दिग्दर्शकांचे म्हणणे आहे. याविषयी सुधा सांगते, "पटकथा केवळ एक क्षण वाचून ती लक्षात राहाणे कठीण आहे. त्यामुळे मी केवळ चित्रीकरणाच्या काही मिनिटे अगोदरच पटकथा पाहाते हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. मी गेल्या 30 वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत आहे. पण आतापर्यंत कोणीच माझ्याकडे अशाप्रकारे बोट दाखवले नाही. मी माझ्या कामाचा आदर करते. त्यामुळे माझे दृश्य झाल्यानंतर मी तिथून निघून गेले आणि घडलेल्या गोष्टी प्रोडक्शन हाऊसला कळवल्या. त्यांची मंडळी सेटवर येऊनदेखील दिग्दर्शकाने माझी माफी मागितली नाही. मला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मी आशा करत आहे."