लोकल ही मुंबईची लाइफलाइन आहे. पण, काही दिवसांपूर्वीच घडलेल्या मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान झालेल्या अपघातात हिच लाइफलाइन अनेकांच्या मृत्यूचं कारण ठरली. सोमवारी(९ जून) रोजी मुंब्रा-दिवा स्थानकादरम्यान काही प्रवासी लोकलमधून खाली पडल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर ९ जण जखमी झाले. या घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. काही सेलिब्रिटींनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या.
या घटनेनंतर अभिनेता अभिजीत चव्हाण याने तारांगण या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत लोकलमधून प्रवास करतानाचा जीवघेणा प्रसंग शेअर केला. अभिजीत म्हणाला, "मी दादरवरुन निघालो आणि रात्री ९.३० वाजताची शेवटची ठाणे ट्रेन होती. त्यानंतर मला ट्रेन नव्हती. घाटकोपरजवळ मी जवळ जवळ दरवाजातून पडणार होतो. माझा हात सुटणार तेवढ्यात एकाने मला आतमध्ये ओढून घेतलं. जवळ जवळ मी खाली पडून मरणार होतो. त्यातून मी धडा घेतला की जास्त गर्दी असेल तर दोन ट्रेन सोडूया. काही हरकत नाही. घरी जायचं तर सुखरुप जायचं हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे".
"लोक ट्रेनमधून खाली पडले याचा अर्थ डब्यात बसायलाच जागा नव्हती. प्रत्येकाने थोडा वेळ, थोडा पेशंन्स दाखवावा. दुसरी ट्रेन पकडा काही हरकत नाहीये. त्यातच घुसायचंय, त्यातच मला जायचंय...कसंही करून त्या ठिकाणी मला पोहोचायचंय हे चुकीचं आहे. मुंबई हा फक्त ३५ किमीचा प्लॉट आहे. त्यात दररोज २० हजार परप्रांतीयांचे लोढे येतात. त्यांची चूक नाहीये. पण, प्रशासनही कुठपर्यंत लक्ष देणार? नागरिकांनीही स्वत: जबाबदारी घेतली पाहिजे. घाई करायची गरज नाही", असं म्हणत अभिजीतने मुंब्रा-दिवा लोकल अपघातावर मत मांडलं आहे.