Join us

रेल्वे अपघातात मिलिंद गवळींनी गमावली जवळची व्यक्ती, म्हणाले- "भारतीय रेल्वे पाकिस्तानपेक्षा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 14:12 IST

मिलिंद गवळींनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंब्रा-दिव्या दरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेखही केला आहे. याशिवाय त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, त्याबद्दलही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे. 

'आई कुठे काय करते' मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा समाजातील घडामोडींवर ते पोस्टमधून व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या पोस्ट या अनेकदा चर्चेचा विषय असतो. नुकतंच मिलिंद गवळींनी रेल्वे अपघातावर सविस्तर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुंब्रा-दिव्या दरम्यान झालेल्या अपघाताचा उल्लेखही केला आहे. याशिवाय त्यांच्या जवळच्या व्यक्तीचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला होता, त्याबद्दलही त्यांनी या पोस्टमधून सांगितलं आहे. 

मिलिंद गवळींची पोस्ट

गेल्या २० वर्षांमध्ये ५१ हजार लोकांचा मुंबईत रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. ९ जूनला विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन ट्रेनमध्ये खांबाला लटकलेली माणसे एकमेकांना आदळली आणि १४ जण खाली रुळावर पडले. त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला. अनेक वर्षांपूर्वी माझ्या शारदाश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका वर्गीस मॅडम रेल्वेतून उतरताना वांद्रे येथे प्लॅटफॉर्मवर पडल्या, त्या अपघातात त्या गेल्या. आपल्या आजूबाजूला असंख्य लोक आहेत ज्यांचं कोणी ना कोणी तरी रेल्वेमध्ये दगावला किंवा जखमी झालं आहे. गेल्या पंधरा वर्षांमध्ये १४ हजार मृतदेह enclaimed आहेत, त्यांची ओळखच पटलेली नाहीये. 

जपानची रेल्वे सगळ्यात बेस्ट

जपानमधील बुलेट ट्रेन जगातील सगळ्यात सुरक्षित रेल्वे आहे. गेल्या ५० वर्षात तिथे एकही मृत्यू झालेला नाही.  यामध्ये दोन नंबरवर चीन आणि तिसरा नंबर स्वित्झर्लंड. भारतीय रेल्वे पाकिस्तान आणि बांगलादेशपेक्षा बरी आहे एवढेच. ब्रिटिशांनी  रेल्वे बांधली त्यावेळेला तीन क्लासेस होते. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड क्लास होता. मग स्वातंत्र्यानंतर आपण फर्स्ट क्लास आणि सेकंड ठेवला. थर्ड क्लास काढून टाकला. माझं तर असं मत आहे की सेकंड क्लास पण काढून टाकावा. आपण सगळे भारतीय फर्स्ट क्लासच आहोत. पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये मेट्रोत कुठलाही क्लास नसतो. सगळेच प्रवासी फर्स्ट क्लास असतात.

सांगितला मेट्रो प्रवासाचा अनुभव

भारतामध्ये लोकसंख्या ही सगळ्यात मोठी समस्या आहे, त्यामुळे कितीही सुधारणा केली तरी ती कमीच पडत जात असते. पूर्वी मेट्रोने फार कमी लोक जायचे, मोकळ्या असायच्या. आता परवा अंधेरीच्या पासपोर्ट ऑफिसला मी मेट्रोने गेलो, जाताना वर्सोवावरनं सुटत असल्यामुळे बसायला जागा मिळाली. पण येताना साडेचार वाजता चकाला स्टेशनला रेल्वेला असते तशीच तुडुंब गर्दी होती. एकमेकांना डब्यात कोंबत होते. मी नशीबवान आहे, मला प्रवासाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे मी त्या चेंगराचेंगरी, गर्दीमध्ये गेलो नाही. पण सगळ्यांनाच तो पर्याय नसतो. पण आपल्या सगळ्यांना गरीब असो की श्रीमंत...माणसांसारखा प्रवास करायला मिळावा. घुरंढोरांसारखा नाही...

प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा 

Irony is जगातली सगळ्यात महागडं luxurious ट्रेन तिकीट भारतीय रेल्वे हेरिटेज ऑफ इंडिया, प्रेसिडेन्शल सूटचं तिकीट २० लाख रुपये आहे. आता या ट्रेनमध्ये मला प्रवास करायला आवडेलच. पण त्याचबरोबर मला सामान्य लोकांसाठी असलेली रेल्वेमध्ये सुद्धा सकाळच्या वेळेला दादर स्टेशनला शांतपणे बसून प्रवास करायला सुद्धा आवडेल.जपान सारखं माणसांच्या जीवाची जाणीव आपण ठेवायला हवी. सगळ्यांचा प्रवास सुरक्षितच करायला हवा. सुरक्षिततेसाठी  योग्य ते बदल करायला हवेत.

टॅग्स :मिलिंद गवळीआई कुठे काय करते मालिकामुंबई लोकल