सध्या राज्यात हिंदी सक्तीवरुन घमासान सुरू आहे. शालेय अभ्यासात पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयाला सगळीकडूनच विरोध होत आहे. हिंदी सक्तीवरुन काही सेलिब्रिटींनी सरकारला धारेवर धरलं आहे. हेमंत ढोमे, समीर चौघुले यांनी पोस्ट शेअर करत सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. तर आता लोकप्रिय लेखक अरविंद जगताप यांनी याबाबत पोस्ट केली आहे.
अरविंद जगताप यांनी पोस्ट करत हिंदी सक्तीवरुन राज्यसरकारला सणसणीत टोला लगावला आहे. "पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन् आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासून शिकायचं म्हणा ना", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. अरविंद जगताप यांची ही पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत.
सरकारने जीआर काढत राज्यातील सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. हिंदी भाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असल्यास २० पेक्षा जास्त विद्यार्थी हवेत. अन्यथा तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकवण्यात येईल, असं जीआरमध्ये म्हणण्यात आलं होतं.