संकर्षण कऱ्हाडे हा मराठी सिनेसृष्टीचा लाडका नट आहे. सिनेमा, नाटक, टीव्ही मालिका अशा सगळ्यांच माध्यमांतून त्याने छाप पाडली आहे. यासोबतच तो उत्तम लेखकही आहे. संकर्षणचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे आणि तो चाहत्यांसोबत अपडेट्सही शेअर करत असतो. संकर्षणच्या पोस्ट या कायमच विचार करायला लावणाऱ्या असतात. नुकतंच त्याने वडिलांबाबत एक खास पोस्ट लिहिली आहे.
शेतातील बैल आजारी पडल्याचं समजताच संकर्षणच्या वडिलांनी गाव गाठलं. याचा किस्सा संकर्षणने पोस्टमधून शेअर केला आहे. संकर्षणने त्याच्या वडिलांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये ते शेतातील बैलाची काळजी घेताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करत तो म्हणतो, "आमचे बाबा परवा मुंबईहून तडकाफडकी परभणीला निघाले. कारण काय? तर, शेतातल्या गड्याचा फोन आला की आपल्या शेतातला बैल रामा २ दिवस झाले जागचा उठत नाहीये, खात नाहीये...मी म्हणलं बाबा गडी आहे की तुम्ही जायची काय गरज? मला म्हणाले, उद्या तुला बरं वाटलं नाही तर अस्साच परभणीहून पळत येईन ना? मी म्हणलं "मी काय बैलासारखाच का??" बाबा म्हणाले "नाही , पण बैल पोरासारखा सांभाळावा...".
पुढे संकर्षण म्हणतो, "निघाले ते निघालेच...२ दिवस त्याच्यासोबत वेळ घालवला. त्याला खूप माया केली. त्याला स्वतःच्या हाताने खाऊ घातलं. देवाचा धावा करुन त्याला तीर्थ म्हणून पाणी पाजलं आणि आता रामा कामाला लागला...काय म्हणाल तुम्ही ह्याला?? म्हणा काही पण , सगळ्या आघाड्यांवर सतत कसं १०० टक्के खरं उतरायचं हे बाप माणसांना बरोबर कळतं". संकर्षणच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.