Join us  

जीव माझा गुंतला मालिकेत रंजक वळण, मल्हारचं सरप्राईझमुळे निर्माण होणार नवीन वादळ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 1:17 PM

अंतराचा वाढदिवस घरचे मिळून साजरा करणार असून, मल्हारचा आणि त्याच्या कुटुंबाला असं वाटत आहे की श्वेताचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मल्हार तिच्यासाठी सरप्राईझ प्लॅन करणार आहे

'जीव माझा गुंतला' मालिकेमध्ये पत्रिका प्रकरणामुळे श्वेता कायमच थोडीशी घाबरलेली असते. मल्हारच्या पत्रिकेत असलेल्या दोषामुळे त्याचं लग्न अशाच मुलीशी होऊ शकतं जिच्या पत्रिकेमध्ये देखील सारखा दोष आहे. पण, पत्रिकेच्या करण्यात आलेल्या अदलाबदलीमुळे सगळाच घोळ होऊन बसला. मल्हारचं लग्न अंतराऐवजी श्वेताशी ठरलं. 

अंतरा, मल्हार आणि मल्हारच्या घरचे याबद्दल अनभिज्ञ आहेत. अंतराचा वाढदिवस घरचे मिळून साजरा करणार असून, मल्हारचा आणि त्याच्या कुटुंबाला असं वाटत आहे की श्वेताचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच मल्हार तिच्यासाठी सरप्राईझ प्लॅन करणार आहे. आता अंतराच्या वाढदिवशी मल्हारने श्वेतासाठी पाठवलेलं स्पेशल सरप्राईज घरच्यांना आनंद देणार की नवं वादळ आणणार? यामुळे अंतराच्या घरी नक्की काय गोंधळ होणार ? नियती मल्हार आणि अंतराला एकत्र आणू पाहते आहे. अंतराच्या पत्रिकेतील दोषामुळे मल्हार आणि अंतराचं सूत जुळणार ? हे जाणून घेणेही रंजक असणार आहे. 

आपण सगळेच आयुष्यात एका गोष्टीला खूप जपतो आणि ती म्हणजे नाती. घराचा पाया याच नात्यांनी आणि त्यामधील विश्वासाने मजबूत होतो. कोल्हापुरातील शितोळेंच्या घरात वाढलेली अंतरा देखील अगदीच अशीच आहे. सगळ्यांच्या मनाचा विचार करणारी, अत्यंत स्वाभिमानी, संस्कारी, आणि मेहनती. अंतरावर तिच्या कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे कष्ट आणि संघर्ष तिच्या पाचवीला पुजले आहेत.

 

घरातील एकटी कमावती अंतरा ऑटो रिक्षा चालवून घर सांभाळते. तर, दुसरीकडे मल्हार आईचा लाडका, श्रीमंत व्यावसायिक. त्याच्यासाठी पैसा खूप महत्वाचा आहे. यशाचा ताठा असल्यामुळे तो मग्रूर आहे. व्यवहार ही प्राथमिकता असल्यामुळे उगाच भावनेत अडकणारा वा हळवा अजिबात नाही. असे परस्परविरोधी मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. नात्यांचा गुंता आणि पराकोटीचा द्वेष यामध्ये या दोघांचं नातं कुठलं वळण घेईल हे अनुभवणं रंजक असणार आहे.