Join us  

गौरव खन्नाला मालिका नाहीतर करायचा आहे सिनेमात काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2017 9:49 AM

‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या भव्य फॅण्टसी मालिकेचा नायक गौरव खन्नाने आजवर ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘ये प्यार ना होगा ...

‘प्रेम या पहेली- चंद्रकांता’ या भव्य फॅण्टसी मालिकेचा नायक गौरव खन्नाने आजवर ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘ये प्यार ना होगा कम’ यासारख्या मालिकांमधून भूमिका साकारल्या आहेत.परंतु टीव्ही वाहिन्यांवर रोज सादर होणा-या नव्या मालिका आणि त्यातील नवे कलाकार यामुळे निर्माण होणारी स्पर्धा यांचा त्याच्यावर कोणताही परिणाम होताना दिसत नाही. उलट तो सांगतो की त्याला नव्या कलाकारांबरोबर काम करण्यास अधिक आवडते “कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीतरी नवीन असते.” “तुल्यबळ स्पर्धा असेल, तर तुमच्यातील उत्कृष्ट गुणांना ती प्रोत्साहन देते. माझी स्पर्धा माझ्याशीच आहे. त्यामुळेच कालच्यापेक्षा आजची माझी कामगिरी चांगली असते आणि आजच्यापेक्षा उद्याची,” असे गौरव सांगतो.आजवर त्याने अनेक नवख्या कलाकारांबरोबर भूमिका साकारल्या असून त्यांच्यातील उत्साह आणि मेहनत करण्याच्या तयारीने त्याला नेहमीच प्रेरणा दिली आहे. “त्यांच्यात मेहनत करण्याची इच्छा असते आणि त्यांचा उत्साह तुम्हाला आकर्षित करतो.काम करण्याची त्यांची तळमळ ही संसर्गजन्य असते, असं मला वाटतं,” असे गौरव म्हणाला. गौरवने आतापर्यंत ब-याच काल्पनिक मालिकांतून भूमिका साकारल्या असून आता तो ‘प्रेम या पहेली-चंद्रकांता’सारख्या फॅण्टसी मालिकेत भूमिका साकारीत आहे. परंतु त्याला आता वास्तववादी मालिका आणि कार्यक्रम यामध्ये काम करण्याची ओढ लागली आहे. “मला आता रिअ‍ॅलिटी शोंमध्ये काम करायचं आहे- मग तो नृत्यविषयक असू दे की कोणता अ‍ॅक्शनपॅक्ड कार्यक्रम असू दे. मला एखाद्या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक होण्याची नेहमीच इच्छा होती, पण ती अजून पूर्ण झालेली नाही,” असे तो म्हणाला.गौरवला चित्रपटांमध्येही भूमिका साकारवयाची आहे.“मी माझ्या करिअरची पध्दतशीर आखणी वगैरे केलेली नाही.मी मुंबईत एमबीए करण्यासाठी आलो, नंतर मार्केटिंग व्यवस्थापक म्हणून काम केलं, नंतर मॉडेलिंग केलं आणि नंतर जाहिराती आणि टीव्ही मालिकांमधून कामं केली.त्यामुळे एखादी चांगली भूमिका मला मिळाली,तर हिंदी सिनेमा काम करण्याचीही माझी तयारी आहे,” असे त्याने सांगितले.