मिलिंद गवळी (Milind Gawali) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते आहेत. त्यांनी मालिका आणि सिनेमात विविधांगी भूमिका साकारुन रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. त्यांनी आई कुठे काय करते मालिकेत साकारलेली अनिरुद्धची भूमिका खूप गाजली. त्यानंतर ते ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मालिकेत काम करताना दिसले होते. तसेच ते सोशल मीडियावर चाहत्यांना अपडेट देत असतात आणि सिने कारकीर्दीतील किस्से शेअर करत असतात. नुकतेच त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यात त्यांनी लेखक, निर्माते आणि दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
मिलिंद गवळी यांनी इंस्टाग्रामवर फोटोंचा आणि व्हिडीओचा कोलाज शेअर करत लिहिले की, ''श्री रत्नाकर मतकरी, लेखणीवर ज्या माणसाचं प्रभुत्व होतं, शब्दांचा भंडार होता, जे व्यक्त करायचे ते अचूकपणे शब्दात मांडायचे, माझ्यासमोर आलेल्या त्यांच्या स्क्रिप्टमधलं एकही वाक्य किंवा शब्द मला कधीच बदलता आला नाही, इतक्या वर्षात मी फक्त दिलीप प्रभावळकर या कलाकाराला मतकरी काकांच्या स्क्रीप्टमध्ये थोडा बदल करण्याविषयी चर्चा करताना पाहिले होते, "चिट्ठी" या कथेमध्ये दिलीपजींच्या सांगण्यावरून मतकरी काकांनी काही बदल केले होते, नाहीतर आमच्या सारख्या इतर कलाकारांना त्यांच्या स्क्रीप्टमध्ये बदल करणे अशक्यच होतं, इतकी ती स्क्रीप्ट परफेक्ट असायची.''
''माझे आणि मतकरी काकांचे मैत्रीचे नाते झाले''त्यांनी पुढे म्हटले की, ''मतकरी काकांशी मुलगी सुप्रिया विनोद हिच्या बरोबर 'आहट' मालिकेमध्ये मी काम केलं, त्यावेळेला "माझे बाबा एक सिनेमा करतायेत तर तू त्यांना भेट" आणि पहिल्या भेटीपासूनच माझे आणि मतकरी काकांचे मैत्रीचे नाते झाले, मी वयाने आणि कर्तृत्वाने खूप लहान होतो पण त्यांनी मला कधीही ते जाणू दिलं नाही, मी अति उत्साही होतो आणि सतत सकारात्मकच असायचो आणि हे त्यांना आवडायचं, "गहिरे पाणी", मालिका आपण करूया का?" असं त्यांनी मला ज्या वेळेला विचारलं, आणि मी अति उत्साहात म्हणालो "चला सुरू करूया", आणि पायलट एपिसोड आम्ही वसईच्या एका वाड्यामध्ये शूट केला. नंतर त्याच मालिकेमधल्या सहा- सात गोष्टींमध्ये त्यांनी मला भूमिका दिल्या, हिंदीमध्ये करूया का ? असं विचारलं असताना तोच उत्साह मी दाखवला आणि "रात" नावाचं पायलट एपिसोड शूट केला. जो नलिनी सिंग यांनी दिल्ली दूरदर्शनसाठी घेतला.''
''त्यांच्यासोबतच्या आठवणींचा खजिना आहे''''मतकरी काकांना सिनेमा दिग्दर्शित करायचं खूपच पॅशन होतं, जे नंतर "इन्व्हेस्टमेंट" राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट त्यांनी बनवला. मतकरी काकांबरोबरच्या गप्पा तासंतास रंगाच्या, त्यांच्या दादरच्या घरात पुस्तकांची खोली होती, वरपासून खालपर्यंत पुस्तकांच्याच भिंती होत्या, त्या खोलीत त्यांच्या बऱ्याच नाटकाचं वाचन मी ऐकलं, त्यांच्या थळच्या बंगल्यात सुद्धा ते मला घेऊन गेले होते, आमच्या इतक्या गप्पा व्हायच्या की सुप्रिया बऱ्याच वेळेला गमतीने म्हणायची की "अरे माझे वडील आहेत ते, तरी बऱ्याचशा गोष्टी आधी तुला कळतात. मतकरी काकांचा माझ्यावर फार जीव होतो, मला ते जाणवायचं, दादर सोडून मी अंधेरीला राहायला गेलो तेव्हा आमच्या भेटी कमी झाल्या, पण फोनवर गप्पा व्हायच्या, त्यांच्याबरोबर सिनेमा करायचं स्वप्न अपूर्णच राहिलं, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, पण माझ्याकडे त्यांच्याबरोबरच्या आठवणींचा खजाना आहे. ते नसले तरी त्यांचे विचार, त्यांच्या गोष्टी, त्यांचे शब्द कायम बरोबर असतात.'', असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.