हिमालयाच्या कुशीत डेडली आणि डेअरिंगबाज थरार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 13:51 IST
हाडे गारठून टाकणाऱ्या हिमालय पर्वतरांगांच्या खडतर रस्त्यांवर जीव मुठीत घेऊन दीड हजार किलोमीटर ट्रक चालवणे काही सोपी गोष्ट नाही. ...
हिमालयाच्या कुशीत डेडली आणि डेअरिंगबाज थरार
हाडे गारठून टाकणाऱ्या हिमालय पर्वतरांगांच्या खडतर रस्त्यांवर जीव मुठीत घेऊन दीड हजार किलोमीटर ट्रक चालवणे काही सोपी गोष्ट नाही. आलिशान आणि सर्व सुखसुविधांमध्ये राहणाऱ्या सेलिब्रेटींसाठी तर नाहीच नाही. पण स्वहिंमतीवर संग्राम सिंग, मंदिरा बेदी आणि वरुण शर्मा तीन सेलिब्रेटींनी हे चॅलेंज ‘आईस रोड ट्रकर्स - इंडियाज् डेडलिएस्ट रोडस्’ या जिगरबाज रिअॅलिटी शोमध्ये स्वीकारले.तो म्हणतो, क्षणाक्षणाला असणारा मृत्यूचा धोका पण तरीदेखील तो पत्कारण्याच्या खुमखुमीने अंगात उत्साह, ऊर्जा आणि उमेद संचारायची. रेसलर संग्राम सिंगने ‘सीएनएक्स मस्ती’शी बोलताना या प्रवासादरम्यान आलेले आणखी इतरही थरारक अनुभव शेअर केले. * प्रोमोज आणि एपिसोड पाहून थक्क होऊन जाते. तुमची कशी स्थिती होती?तुम्ही जे पाहता, त्याच्यापेक्षा शंभरपट अधिक धाकधुक आमच्या मनात असायची. हिमालयाच्या कुशीतील हा डेडली आणि डेंअरिंगबाज थरार मी आयुष्यभर विसरू नाही शकत. कारण मला उंचीची भीती वाटते. आणि मला १८ हजार फुट उंचीवर खच-खळग्यांनी भरलेल्या आणि बाजूला नजर जाईपर्यंत खोलवर दरी अशा मृत्यूला खुले आमंत्रण देणाऱ्या रस्त्यांवरून ट्रकसारखे जड वाहन चालवायचे म्हणजे अवघडच होते.* शोपूर्वी याची कल्पना होती?संपूर्ण जगात नावाजलेल्या ‘आयआरटी’ या शोचा फॉरमॅट माहित होता. संभाव्य धोक्याची कल्पनासुद्धा होती. पण प्रत्यक्ष जेव्हा प्रवास सुरू झाला तेव्हा कळाले की, वास्तव आणखी भयावह आहे. ‘मी का हो म्हणालो असेल’ म्हणून स्वत:वर चिडलोसुद्धा; पण भीतीवर विजय मिळवून स्वत:ला सिद्ध करण्याची दृढइच्छासुद्धा होती.* शारीरिकरीत्या किती अवघड प्रवास होता?मी रेसलर आहे. व्यायाम-डाएटमुळे मी स्वत:ला एकदम फिट समजायचो. पण एवढ्या उंचीवर जेव्हा तुम्हाला श्वास घेण्यासाठी पुरेसा आॅक्सिजन नसतो तेव्हा खरी कसरत होते. शुन्याच्या खाली तापमानात संपूर्ण लक्ष केंद्रित करून ट्रक चालवताना तुमच्या मानसिक आणि शारीरिक स्टॅमिनाची अग्निपरीक्षा असते. कारण थोडे जरी लक्ष विचलित झाले की, नीट खोल दरीत जायची भीती सतत मनात राहते.* प्रवासामध्ये तुम्ही राहायचा कुठे?१५ दिवसांच्या या प्रवासात आम्ही काही दिवस खुल्या आकाशाखाली टेंटमध्ये राहिलो. जिगरबाज : संग्राम सिंग* म्हणजे लाईफ चेंजिंग अनुभव होता तर?हो. खरंच जीवनाकडे पाहण्याचा माझा दृष्टीकोनच बदलला. प्रवासात आम्ही केवळ ट्रक चालवत नव्हतो . मनाली ते टुरटूक या दीड हजार किमीच्या रस्त्यावरील दुर्गम खेडी, वर्क कॅम्प आणि सर्वोच्च उंचीवर असणाऱ्या सैनिकी चौक्यांमध्ये जीवनावश्यक वस्तू आणि सामान पोहचवण्याचे काम आम्ही केले. डोळ्यातील पाणीसुद्धा गारठून जाईल एवढ्या थंडीत हे सैनिक देशाच्या रक्षणासाठी येथे उभे राहतात हे पाहून त्यांच्याबद्दलचा अभिमान शतपटीने वाटला. भारतीय सैनिकांना मी सलाम करतो.* शोमुळे काय शिकायला मिळाले?आयुष्याची किंमत कळाली. त्या दुर्गम भागांत राहणारे लोक एवढ्या कठीण परिस्थितीतही अगदी आनंदी असतात. त्या लोकांना भेटून मला वाटले की, सगळं असूनही आपण छोट्या-मोठ्या गोष्टींवरून नशिबाला दोष देत जणूकाही दु:खी होण्याचे कारणच शोधत असतो. खरंच किती नशिबवान आहोत आपण; पण त्याची किंमत आपल्याला नाही. हा माझ्यासाठी मोठा धडा होता. तसेच ट्रक चालकांविषयी आदर वाढला.* म्हणजे?ट्रक ड्रायव्हर्स किती हालापेष्टा सहन क रतात. तुटपुंज्या पगारासाठी त्यांना महिनो-महिने कुटुंबापासून दूर राहावे लागते. जीवनावश्यक वस्तू देशाच्या कानरकोपऱ्यात पोहचविण्याचे अत्यंत महत्त्वाचे काम ते कर असतात. तरीदेखील त्यांना कोणी मानसन्मानाने वागवत नाही. पण आता माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला आहे.