मराठी अभिनेताअंशुमन विचारेला (Anshuman Vichare) आपण अनेक मालिका, कॉमेडी शोज, सिनेमांमध्ये पाहिलं आहे. विनोदी कलाकारांमध्ये त्याचं नाव आवर्जुन येतं. 'फू बाई फू', 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी रिअॅलिटी शोमध्ये तो दिसला. सध्या अंशुमन विचारे फारसा काम करताना दिसत नाही. हास्यजत्रा सोडल्यानंतर तो खूप कमी दिसला. याचं कारण काय असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. नुकतंच अंशुमन विचारेने यामागचं कारण सांगितलं आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अंशुमन विचारे म्हणाला, "मी वेगळ्या कामासाठी थांबलोय. वेगळं काहीतरी करण्याची इच्छा आहे. तरच आपल्यातलं नाविन्यपण टिकू शकतं. २०१९ ला हास्यजत्रा सोडल्यानंतर मी वेगळ्या कामासाठी थांबलोय. मध्ये काही सिनेमे केले पण मला आज सांगायचंय की मी जर बरा अभिनेता वाटत असेल तर माझा विचार करा."
तो पुढे म्हणाला, "काम मिळवण्याबाबतीत माझाच अप्रोच जरा कमी पडत असेल असं मला वाटतं. पण मी आहे, माझा विचार करा. मधल्या काळात मी हिंदीतील काही वेबसीरिजमध्ये कास्ट झालो होतो. पण नंतर माझे फॉलोअर्स कमी आहेत म्हणून मला रिजेक्ट केलं. तर ही सिस्टीम मला पहिल्यांदाच कळली. अभिनयापेक्षा फॉलोअर्स हा क्रायटेरिया एवढा महत्वाचा आहे का? मला वाटतं त्याचं अभिनय कौशल्य बघावं. फॉलोअर्स जास्त म्हणजे चांगला अभिनेता असं असेल तर काहीतरी गडबड आहे असं मला वाटतं. अशी गडबड करु नका. आमचे फॉलोअर्स कमी असतील पण मी चांगला अभिनेता आहे."