'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिका ही सर्वांची आवडती मालिका. ही मालिका गेली १५ हून अधिक वर्ष टेलिव्हिजनवर सुरु आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या मालिकेचे चाहते आहेत. या मालिकेतील सर्वच व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलंय. 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीने काहीच वर्षांपूर्वी मालिकेला रामराम ठोकला. भव्यने एका मुलाखतीत 'तारक मेहता का उल्टा चष्मा'शोबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.
भव्य गांधी 'तारक मेहता का उल्टा चष्मा'बद्दल काय म्हणाला?
एका मुलाखतीत भव्य गांधीला 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका आता मेकर्सने बंद करावी असं वाटतं का असं विचारताच तो म्हणाला की, "असं काही त्यांनी करु नये. अनेक लोकांसाठी TMKOC हे आयुष्य आहे. लोकांना ही मालिका बघायला आवडते. या मालिकेसाठी लोक अक्षरशः वेडे आहेत. लहान मुलंही हा शो तितकाच एन्जॉय करतात. अगदी आजी, आजोबांच्या वयाची माणसंही TMKOC शो आवडीने पाहतात."
भव्य पुढे म्हणाला की, "तारक मेहता जर बंद झालं ना तर या मालिकेची दुसरी रिप्लेसमेंट सापडणार नाही. आणि याची जागा दुसरी कोणतीही मालिका घेऊ शकत नाही. जोवर ही मालिका सुरु राहील, तोवर ही सुरु ठेवण्याचा प्रयत्न करावा. मालिका बंद न करता सुरुच ठेवावी." अशा शब्दात भव्य गांधीने TMKOC बद्दल त्याच्या भावना व्यक्त केल्या. भव्यने साकारलेली टप्पूची भूमिका चांगलीच गाजली. आजही टप्पू अनेकांचा फेव्हरेट आहे.