Join us  

​पिया अलबेला मालिकेसाठी अक्षय म्हात्रेने केले आठ किलो वजन कमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2017 11:42 AM

अक्षय म्हात्रेने सावर रे या मराठी मालिकेत तर युथ या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. मराठीत यश मिळाल्यानंतर अक्षय ...

अक्षय म्हात्रेने सावर रे या मराठी मालिकेत तर युथ या मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. मराठीत यश मिळाल्यानंतर अक्षय हिंदी इंडस्ट्रीकडे वळला. तो पिया अलबेला या मालिकेद्वारे हिंदीमध्ये पदार्पण करत आहे. अक्षय त्याच्या कारकिर्दीतील पहिलीच हिंदी मालिका राजश्री प्रोडक्शनसोबत करत असल्याने सध्या तो खूपच खूश आहे. या मालिकेसाठी अक्षय गेल्या आठ महिन्यांपासून मेहनत घेत आहेत. अक्षयची या मालिकेसाठी निवड आठ महिन्यांपूर्वीच झाली होती. पण प्रोडक्शन हाऊस नायिकेच्या शोधात असल्याने मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात करण्यात आली नव्हती. त्यामुळे अक्षयने त्याला मिळालेल्या या आठ महिन्यांचा सदुपयोग करत त्याच्या व्यक्तिरेखेवर मेहनत घेतली. तो या मालिकेत नरेन ही व्यक्तिरेखा साकारत आहे. नरेन कसा दिसेल, कसा वागेल यावर या मालिकेच्या टीमने चांगलाच अभ्यास केला आहे. तो दिसायला बारीक असून त्याने जिममध्ये जाऊन बॉडी बनवलेली नाहीये असे टीमचे म्हणणे होते. त्यामुळे त्याचा लूक, लकबी आणि बॉडी लँग्वेज यावर अक्षय आठ महिन्यांपासून काम करत आहे. या विषयी अक्षय सांगतो, "या भूमिकेसाठी मी माझ्या आईकडून सध्या योगा शिकतोय. ही व्यक्तिरेखा मी सुरज बडजात्या यांच्याकडून खूप चांगल्याप्रकारे समजून घेतली. त्यांच्यामुळेच मी ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारू शकत आहे. मी गेल्या काही महिन्यांपासून केवळ सॅलड आणि सूप या डाएटवर राहून आठ किलो वजन कमी केले आहे. तसेच या मालिकेत नरेनला प्राण्यांबद्दल माया आहे असे दाखवण्यात आले आहे. पण खऱ्या आयुष्यात मला प्राण्यांविषयी खूप भीती वाटते. पण आता हळूहळू माझ्या मनातून भीती कमी झाली असून त्यांच्याविषयी माझ्या मनात प्रेम निर्माण झाले आहे."