Join us  

"२०१६ मध्ये मालिका संपली पण...", 'का रे दुरावा'च्या आठवणीत सुयश टिळकची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 1:34 PM

'का रे दुरावा' ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका होती. या मालिकेत सुयश टिळक आणि सुरुची अडारकर मुख्य भूमिकेत होते.

सुयश टिळक हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 'का रे दुरावा' मालिकेतून सुयश घराघरात पोहोचला. या मालिकेतील जय-अदितीची जोडी प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस उतरली होती. सुयश मालिकेत जयच्या भूमिकेत होता तर अदितीची भूमिका अभिनेत्री सुरुची अडारकरने साकारली होती. २०१४ साली प्रसारित झालेल्या या मालिकेने दोन वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. 

नऊ वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे १८ ऑगस्ट २०१४ रोजी झी मराठीवर या मालिकेचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला होता. यानिमित्ताने सुयश टिळकने 'का रे दुरावा' मालिकेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. सुयशने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन का रे दुरावा मालिकेचं पोस्टर शेअर केलं आहे. या मालिकेसाठी त्याने केलेल्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

"१८ ऑगस्ट २०१४ ह्याच दिवशी काही वर्षांपूर्वी हा 'का रे दुरावा'चा प्रवास सुरू झाला. २०१६ मध्ये मालिका संपली. पण, त्या मालिकेने जोडले गेलेले प्रेक्षक आजही त्या कथेवर पात्रांवर भरभरून प्रेम करतात. भेटले की आवर्जून आठवण सांगतात. आपण करत असलेल्या, केलेल्या कामांची अशी पोचपावती मिळत राहते तेव्हा नवीन उत्साह उर्जा मिळते. आज इतक्या वर्षांनी पुन्हा हे पात्र साकारले तर नक्कीच त्यात अनुभवामुळे आलेलं शहाणपण येईल आणि आधी केलं त्यापेक्षा चांगलं काम करता येईल त्यासाठी तुम्हा सर्वांचेच खूप आभार," असं म्हणत सुयशने पोस्ट शेअर केली आहे. 

'बाईपण भारी देवा' फेम अभिनेत्रीची 'ठरलं तर मग'मध्ये एन्ट्री, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

"मी राहुल गांधींचा बायोपिक केला तर तुम्हाला बघण्याचा अट्टाहास नाही", सुबोध भावे असं का म्हणाला?

सुयशने 'का रे दुरावा'साठी केलेल्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. या पोस्टवर सुरुचीने कमेंट करत "खूप खास" असं म्हटलं आहे. तिच्या या कमेंटवर सुयशने "माझ्या जयसाठी अदिती झाल्याबद्दल धन्यवाद," असा रिप्लाय केला आहे. 

टॅग्स :सुयश टिळकमराठी अभिनेतासुरुची आडारकर