चित्रपटसृष्टीत अभिनय करत नाव कमावलेल्या अनेक दिग्गज कलाकारांची मुलं आता हळूहळू इंडस्ट्रीत पाऊल टाकत आहेत. बॉलिवूड, साऊथ इंडस्ट्री किंवा मराठी सिनेसृष्टी असो सर्वच क्षेत्रात ही नवी पिढी दिसून येत आहे. काहींना सुरुवातीलाच यश मिळतंय, तर काहीजण स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी अजूनही झगडताना दिसत आहेत. त्यामुळे 'घराणेशाही' किंवा 'नेपोटिझम'सारखे मुद्देही चर्चेत येतात. मात्र काही स्टार किड्स याला अपवाद ठरले आहेत. अनेकांनी पालकांच्या पावलावर पाऊल न टाकतं आपलं वेगळं करिअर निवडलयं. आवड आणि कौशल्याच्या जोरावर त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असंच एक उदाहरण म्हणजे, साऊथ इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याचा मुलगा थेट आयएएस अधिकारी बनला आहे.
प्रसिद्ध तमिळ अभिनेते चिन्नी जयंत यांच्या लेकानं UPSC परीक्षा पास केली आहे. श्रुतंजय नारायणन यांनी दुसऱ्या प्रयत्नांत यश मिळवलं आहे. वडिलांचं चित्रपटसृष्टीत मोठं नाव असतानाही श्रुतंजय नारायणन यांनी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला. अभिनयाच्या वातावरणात वाढूनसुद्धा श्रुतंजय यांना अभ्यास आणि शिक्षणात जास्त रस होता. त्यांनी गुइंडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी घेतली आणि अशोका युनिव्हर्सिटीतून मास्टर्स पूर्ण केलं.
पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी एका स्टार्टअपने कामाचाही अनुभव घेतला. मात्र, त्यांचं अंतिम ध्येय होतं आयएएस अधिकारी बनण्याचं. त्यांनी नोकरी करतानाच दररोज ४–५ तास सेल्फ स्टडी सुरू ठेवली. रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करत त्यांनी स्वतःच्या खर्चाची जबाबदारीही उचलली. अखेर श्रुतंजय यांनी यूपीएससी परीक्षेत अखिल भारतीय ७५ वा क्रमांक मिळवला होता. हा त्यांचा दुसरा प्रयत्न होता. UPSC टॉप १०० मध्ये त्याचं नाव आलं होतं.
सध्या श्रुतंजय नारायणन हे तामिळनाडूच्या तिरुप्पूर जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी, विल्लुपुरम जिल्ह्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी (विकास) म्हणून नियुक्त होते. तिथे त्यांनी ग्रामीण भागात अनेक विकास योजना आणल्या. गिंडी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून पदवी आणि त्यानंतर अशोक विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं आहे.