मध्य पूर्वेतील वाढत्या तणावामुळे सध्या ऊर्जा क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे. याचा थेट परिणाम घरगुती इंधनावर होताना दिसत आहे. अनेक ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही जण आगाऊ सिलेंडर नोंदणी करून साठा वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरचा तुटवडा भासत आहे. यावर अभिनेता आणि चित्रपट निर्माता प्रकाश राज यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
६० वर्षीय प्रकाश राज यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर टीका केली आहे. त्यांनी लिहिले, "प्रिय नागरिकांनो, जसं आता आपण पाहतोय की... घरे, हॉटेल्स आणि अगदी स्मशानभूमींवरही परिणाम होत आहे. आता यावर गोभी 'भक्तांची' प्रतिक्रिया काय आहे, ते बघायचं आहे". प्रकाश राज यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये दोन गट पडल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी त्यांच्या मताला पाठिंबा दिला. तर काही यूजर्सनी त्यांच्या वक्तव्यावर टीकाही केली.
एका युजरने परिस्थितीचे गांभीर्य मांडताना म्हटले की, "ही खरोखर भयानक स्थिती आहे, व्यवसाय बंद पडत आहेत". तर दुसऱ्या एका युजरनं प्रकाश राज यांना सुनावत म्हटले की, "पश्चिम आशियात युद्ध सुरू आहे, तेल पुरवठ्यावर परिणाम होणे स्वाभाविक आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीला राजकीय वळण का देता?". दरम्यान, पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं की, देशांतर्गत घरगुती गॅसची गरज पूर्ण करण्यासाठी भारताकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊन सिलिंडर बुक करण्याची गरज नाही. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत रिफायनरी कंपन्यांनी एलपीजी उत्पादनात २५ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे.