संजय लीला भन्साळींच्या (Sanjay Leela Bhansali) गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे 'हम दिल दे चुके सनम'. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांची रोमँटिक केमिस्ट्री, त्यांची अधुरी प्रेमकहाणी आणि अजय देवगणचा दमदार अभिनय यामुळे सिनेमा आजही सर्वांच्या लक्षात आहे. यातील प्रत्येक गाणी गाजली. या सिनेमाला २६ वर्ष पूर्ण झाल आहेत. आता नुकतंच संजय भन्साळींनी सेटवर सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री कशी होती याचा खुलासा केला.
'हम दिल दे चुके सनम' सिनेमाच्या सेटवरच सलमान-ऐश्वर्या यांच्यातली जवळीक वाढली होती. सिनेमाचा शेवट तर सलमानला अजिबात आवडला नव्हता. सिनेमाच्या आठवणी शेअर करत ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत संजय लीला भन्साळी म्हणाले, "तेव्हा सेटवर प्रेमाचा वारे वाहत होते. फक्त सलमान-ऐश्वर्याच नाही तर इतर सर्वच स्टारकास्ट अतिशय प्रेमळ होती. जोहरा सहगल, हेलन, विक्रम गोखले, स्मिता जयकर, सलमान-ऐश्वर्या सगळेच कुटुंबासारखे राहायचे. अशी मजा मला अन्य कोणत्या सिनेमाच्या शूटिंग सेटवर आली नसेल."
सिनेमाच्या सीक्वेलबाबत विचारल्यावर ते म्हणाले, "याचा सीक्वेल बनवण्याची माझी इच्छा नाही. सिनेमाचा जो शेवट झाला तिथेच तो सोडून दिला पाहिजे. मला तसंही माझ्या कोणत्याच सिनेमाचा सीक्वेल बनवायची इच्छा नाही. पण संधी मिळालीच तर मी खामोशीचा बनवेन. कारण मला त्याचा शेवट वेगळा करायचा आहे."
'हम दिल दे चुके सनम' १९९९ साली रिलीज झाला. सलमान-ऐश्वर्याची केमिस्ट्री आजही लोक विसरलेले नाहीत. रोमँटिक सिनेमांमध्ये या सिनेमाचं नाव आवर्जुन येतं. आज इतक्या वर्षांनंतरही यातील गाणी ऐकली जातात.