लोकशाहीचा आत्मा म्हणजे भारतीय संविधान. देशाच्या विविधतेला एकत्र बांधून ठेवणारा आणि सामान्य नागरिकाला त्याच्या हक्कांची जाणीव करून देणारा हा दस्तऐवज. संविधानाच्या ७५व्या वर्धापन दिनानिमित्त सध्या 'राष्ट्रग्रंथ' या नाटकाची चांगलीच चर्चा आहे. या नाटकाचा पुढील प्रयोग यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा येथे २६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सादर होणार आहे. जाणून घ्या या नाटकाविषयी
'राष्ट्रग्रंथ' नाटकाविषयी
या नाटकाचा निर्माता दर्शन महाजनने एकाच दिवशी एकाचवेळी ३६ जिल्ह्यात ७५ महाविद्यालयांमध्ये आझाद हिंद गाथा या नाटकाचे ७५ प्रयोग केले होते. तर ‘पृथ्वीचे शेतकरी’ या नाटकाची निर्मिती सुद्धा दर्शन महाजनने केली होती.
या नाटकाच्या निमित्ताने दर्शन महाजन सांगतो ‘संविधान हा फक्त कायद्याचा दस्तऐवज नाही, तो लोकशाहीचा आत्मा आहे. ‘राष्ट्रग्रंथ’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांना संविधानाशी भावनिक आणि वैचारिक स्तरावर जोडण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. यालाच जोडून नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहनी यांनी सांगितले की, “हा नाट्यप्रयोग म्हणजे संविधानाचा इतिहास नव्हे, तर त्याचा समाजातील महत्त्वाचा प्रवास आहे. सामान्य माणसाच्या जीवनातील संविधानाचे योगदान समजून घेण्यासाठी हे नाटक महत्त्वाचे आहे.”
'राष्ट्रग्रंथ' नाटकाची वैशिष्ट्ये: या दोन-अंकी नाटकात ५१ भूमिका साकारल्या जाणार असून, १९ हून अधिक कलाकारांच्या सहभागाने हे भव्यदिव्य नाटक सादर होईल.
शुभारंभाच्या प्रयोगाविषयी:२६ जानेवारी २०२५, सकाळी ११ वाजता, यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा. हे नाटक लोकशाहीच्या पायाला साक्ष देणाऱ्या प्रत्येकासाठी आवर्जून पाहावे असेच आहे.
का पाहावे नाटक?संविधानाच्या निर्मितीमागील संघर्ष, त्याचे महत्त्व आणि समाजातील त्याची भूमिका उलगडणारे 'राष्ट्रग्रंथ' हे नाटक प्रेक्षकांना प्रबोधनाचा आणि मनोरंजनाचा एक नवा अनुभव देईल यात शंका नाही.