Join us  

रश्मी अनपटची नवी मालिका 'शाब्बास सुनबाई', आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 5:57 PM

शाब्बास सुनबाई ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे.

शाब्बास सुनबाई ही मालिका कौटुंबिक आणि पारंपरिक प्रथा, विचार व रूढींना वेगळा दृष्टिकोन देणाऱ्या सुनेची आहे. सोमवार ते शनिवार, संध्याकाळी ७ वाजता प्रसारीत होणाऱ्या या मालिकेतील नायिका संजीवनी ही अत्यंत प्रामाणिक, सारासार विचार करणारी ध्येयवादी मुलगी आहे.  लहानपणापासूनच अत्यंत हुशार असलेल्या संजीवनीला आयुष्यात खूप काही साध्य करायचंय. त्यासाठी तिच्या बाबांनी नेहमीच तिला प्रोत्साहन दिलंय. तिच्या बाबांनी सतत तिच्या मनावर हेच बिंबवलं आहे की तिने सतत पहिलं यावं आणि सर्वोत्कृष्ट असावं. तिने तिच्या वडलांच्या स्वप्नाला आपलसं करत नेहमीच अभ्यासात अव्वल नंबर पटकावत स्वतःचं शैक्षणिक वर्षांत नाव कमावलं आहे. 

संजीवनीच्या स्वप्नांना खरा संघर्ष करावा लागणार आहे तो तिच्या लग्नानंतर. कसं आहे तिचं सासर ? संजीवनीला लग्नानंतर नेमका कशाशी आणि कोणाशी संघर्ष करावा लागणार आहे? प्रवाहाविरुद्ध पोहून आपली स्वप्नं साकारण्यात संजीवनी यशस्वी होणार का?  ह्या  प्रश्नाभोवती  मालिका गुंफलेली आहे. 

नायिकेच्या भूमिकेत रश्मी अनपट तर मुख्य खलनायकाच्या भूमिकेत मयूर खांडगे असे एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. ह्या मालिकेचे लेखन केलं आहे शार्दुल सराफ व पूर्णानंद वांढेकर यांनी, तर दिनेश घोगळे यांनी या मालिकेचं दिग्दर्शन केलं आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माती सुचित्रा आदेश बांदेकर यांनी. शाब्बास सुनबाई ही मालिका आजपासून भेटीला आली आहे.
टॅग्स :रश्मी अनपट