सध्या छोट्या पडद्यावर दिग्दर्शक, निर्माते अनेक नवनवीन प्रयोग करत आहेत. त्यामुळे आतापर्यंत अनेक ऐतिहासिक, पौराणिक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यामध्येच आता 'सत्यवान सावित्री' (Satyavan savitri) ही नवीन मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे. या मालिकेत अभिनेत्री वेदांगी कुलकर्णी हिने मुख्य भूमिका साकारली असून पहिल्यांदाच या भूमिकेविषयी ती व्यक्त झाली आहे.
अलिकडेच वेदांगीने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने भूमिका साकारताना कोणत्या अडचणी आल्या. या भूमिकेसाठी कशाप्रकारे तयारी केली यावर भाष्य केलं आहे.
"सावित्रीच्या भूमिकेसाठी मी बराच अभ्यास केला. शक्य होईल तितकं वाचन केलं. सावित्री तिच्या निर्णयांवर ठाम असते आणि हे साकारताना कधी कधी ते उद्धट वाटू शकतं किंवा तिचे निर्णय ती कोणावर तरी लादते आहे असं देखील वाटू शकतं, ते वाटू नये याची मला कलाकार म्हणून खूप काळजी घ्यावी लागली. तिच्यामधील सौम्यपणा,मृदुपणा पण त्याचवेळी तिच्यामध्ये असलेला ठामपणा आणि स्थैर्य कसं सादर करता येईल याची मी खबरदारी घेतली. तसंच तिची देहबोली आणि तिच्या बोलण्याची पद्धत ही खूप मृदू आहे त्यासाठी देखील मी सराव केला", असं वेदांगी म्हणाली.
पुढे ती म्हणते, "पौराणिक मालिका करताना सगळ्यात जास्त खबरदारी घ्यावी लागते ती म्हणजे भाषेची. या मालिकेत बोलीभाषा ही वेगळी असते. त्यामुळे हे खूप आव्हानात्मक होतं. तसंच आम्ही शूटिंग हे क्रोमावर करतो त्यामुळे ते देखील खूप आव्हानात्मक आहे. कारण लाईव्ह लोकेशनवर आपण आजूबाजूच्या गोष्टी पाहून त्यावर प्रतिक्रिया देऊ शकतो पण इथे सगळं इमॅजिन करून अभिनय करावा लागतो. या भूमिकेमुळे मी एक शिकले ते म्हणजे स्वत:च्या निर्णयांवर ठाम राहणं."