Join us  

'मंतरलेलं घर' मालिकेच्या सेटवर पाहायला मिळतं सुयशचं प्राणीप्रेम !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 8:30 PM

सुयश टिळकने सांगितले की, 'एक घर मंतरलेलं'च्या सेटवर सुद्धा असेच काही प्राणी मी पाळले आहेत. माझ्या अनुपस्थितीत माझी टीम त्यांची उत्तमप्रकारे काळजी घेते. D

छोट्या पडद्यावर 'एक घर मंतरलेलं' या मालिकेतील मुख्य पात्र असलेल्या क्षितिज निंबाळकरला दुर्मिळ वस्तू गोळा करण्याचा अनोखा छंद आहे. ऑनस्क्रीन दुर्मिळ वस्तूंवर प्रेम करणारा सुयश टिळक ऑफस्क्रीन आयुष्यात मात्र प्राण्यांच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. त्याचं हे प्राणीप्रेम 'एक घर मंतरलेलं'च्या सेटवर सध्या पाहायला मिळत आहे. सुयशने चक्क सेटवरच एक कुत्रा पाळला आहे. त्याच्या खाण्यापिण्याची सगळी जबाबदारी सुयशने घेतली आहे. एवढंच नाही, तर सुयश मालिकेच्या सेटवर येताक्षणीच जवळपासचे भटके कुत्रे त्याच्या जवळ येतात. तो देखील प्रेमाने साऱ्यांना कुरवाळतो, त्यांच्याशी खेळतो. एकूणच मालिकेच्या चित्रीकरणाच्या वेळी सारं वातावरणच 'मंतरलेलं' असतं. सुयशने सेटवर पाळलेल्या कुत्र्याचा आता सगळ्यांनाच इतका लळा लागला आहे, की सुयश नसताना त्याच्या प्रोडक्शन, मेकअप व वेशभूषा टीममधील मंडळी सुद्धा या कुत्र्याची काळजी घेतात.

सुयश आणि त्याच्या बहिणीला लहानपणापासूनच प्राण्यांचा लळा लागला. इतरांबाबत आपल्याला असलेल्या जबाबदारीची जाणीव व्हावी म्हणून त्याच्या आईवडिलांनी त्यांना प्राण्यांवर प्रेम करायला शिकवलं. डॉबरमॅन जातीचा 'मेजर' हा सुयशकडे असलेला पहिला कुत्रा होता. तेव्हापासूनच त्याने अनेक प्राणी पाळले आहेत. शिवाय जखमी झालेल्या पशुपक्ष्यांना आपल्या घरी घेऊन येण्याची भूतदया सुद्धा सुयशमध्ये लहानपणापासून होती. केवळ प्राणीच नाही, तर पक्ष्यांची सुद्धा त्याला फार आवड आहे. बालवयातच फुललेलं सुयशचं हे प्राणीप्रेम, आजही तसंच टिकून आहे.

या प्राणीप्रेमाबद्दल बोलताना सुयश टिळक म्हणतो; "मला लहानपणापासूनच प्राण्यांची खूप आवड आहे. नेहमीच एखादा पाळीव प्राणी माझ्याकडे असतोच. 'एक घर मंतरलेलं'च्या सेटवर सुद्धा असेच काही प्राणी मी पाळले आहेत. माझ्या अनुपस्थितीत माझी टीम त्यांची उत्तमप्रकारे काळजी घेते. सेटवर पोचल्यावर लगेचच या प्राण्यांनी आपल्याभोवती गोळा होण्यामुळे होणारा आनंद अवर्णनीय आहे. एखाद्या बापाचा दिवसभराचा थकवा आपल्या मुलांना भेटल्यावर ज्याप्रकारे निघून जातो, तशीच अनुभूती मला या प्राण्यांमुळे मिळते. एखादा प्राणी पाळायचा असेल, तर मात्र आपला मौल्यवान वेळ त्याच्यासाठी देण्याची आपली तयारी असायला हवी. पाळीव प्राणीदेखील एकटे पडल्यावर चिडचिडे होतात. हा एकप्रकारे त्यांच्यावर होणारा अत्याचार ठरतो. त्यामुळे, त्यांची योग्य काळजी घेण्याची व त्यांना हवी तशी वातावरण निर्मिती करण्याची आपली तयारी असावी लागते".

टॅग्स :सुयश टिळक