Join us
Daily Top 2Weekly Top 5

वज्र चित्रपटातील या गाण्याला आकाशवाणीवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 13:51 IST

 विभावरी चित्र यांचा वज्र हा सिनेमा नुकताच सेन्सॉरने संमत केला. मात्र प्रसार भारतीला मात्र त्यातील मानसी नाईक च्या मुजऱ्याचे ...

 विभावरी चित्र यांचा वज्र हा सिनेमा नुकताच सेन्सॉरने संमत केला. मात्र प्रसार भारतीला मात्र त्यातील मानसी नाईक च्या मुजऱ्याचे शब्द खटकले आणि सिनेमाची जाहिरात आणि गाणे चक्क आकाशवाणी च्या सर्व केंद्रासाठी नाकारल्याचा इमेल मिळाला. प्रकरण इथेच थांबले नसून विभावरी चित्रचे कार्यकारी निर्माता शंतनु देशपांडे यांनी न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे सांगितले.      वज्र या मराठी चित्रपटात चंद्रमोहन यांचे शब्द व संगीत असलेल्या मुजरा मध्ये “पल्लू पकड के जाम तू पी ले, अमृत की ये नैय्या” असे शब्द आहेत. या शब्दांमुळे समाज बिघडेल, त्यातही जर मानसी नाईक ही जर तिच्या अदाकारीने जर सिनेमात सांगत असेल तर प्रेक्षक घायाळ होतील आणि खरच पल्लू पकडतील आणि दारूची चटक त्यांना लागेल अशा विचारसरणीतूनच प्रसार भारतीचे मुंबईचे तज्ञ काम करताहेत. मराठी सिनेमाला कुठून तरी चेपलेच पाहिजे हे आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. ९ तारखेला गाणे तपासण्यासाठी पुणे आकाशवाणी केंद्राने मुंबई आकाशवाणीला पाठवले. सकृतदर्शनी गाण्यात शंका आल्यानं त्यांनी शब्द मागवले. आणि दुसऱ्या दिवशी मग एका कमिटीला त्यावर बसवले आणि १० जानेवारीला पुणे केंद्राला इमेल आला की हे गाणे आणि या सिनेमाची जाहिरात स्वीकारता येणार नाही. आकाशवाणी केंद्राचे व्यावसायिक बाजू पाहणारे चंद्रशेखर नगरकर यांनीही नियमापुढे आम्ही काहीही करू शकत नसल्याचे सांगितल्यावर निर्मात्यांना न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. १३ तारखेला हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शीत होतोय. खाजगी रेडीओ म्हणजे मिरची, सिटी यांना मात्र अशा शब्दांचे वावडे नसते आणि केंद्र सरकारचे त्यावर कुठलेच बंधन नसते. केंद्र सरकारच्याच सेन्सॉर बोर्डाने मंजूर केलेले गाणे जर प्रसार भारती नाकारत असेल तर ही गळचेपी थांबणार कधी? दरम्यान गीतकार आणि संगीतकार चंद्रमोहन यांना याबाबत विचारले असता त्यांनी माझे शब्द आणि संगीत एवढे प्रभावशाली असल्याची पावतीच सरकारने दिली आहे असे मत व्यक्त केले.