Join us

लग्न संस्थेवर विश्वास आहे का? सायली संजीव म्हणाली "घर, संसार आणि करिअर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 16:09 IST

सायली संजीवनं लग्न संस्थबद्दल तिचं मत व्यक्त केलं.

 Sayali Sanjeev On Institution Of Marriage: अभिनेत्री सायली संजीव (Sayali Sanjeev) ही तिच्या अभिनयाबरोबरच सौंदर्य आणि स्पष्टवक्तेपणामुळे सातत्याने चर्चेत असते. कधी तिच्या सोशल मीडियावरील फोटोंमुळे, तर कधी नव्या प्रोजेक्टमुळे ती प्रकाशझोतात असते. आज २० जून रोजी तिचा नवा चित्रपट 'समसारा' प्रदर्शित झाला आहे. त्याचनिमित्ताने दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने वेगवेगळ्या विषयांवर मनमोकळेपणाने गप्पा मारल्या. केवळ चित्रपटाविषयीच नव्हे, तर वैयक्तिक आयुष्य, लग्नसंस्था आणि नातेसंबंध यावरही तिनं तिचं मत व्यक्त केलं.

सायली संजीवने 'सुमन म्युझिक मराठी'च्या आम्ही असं ऐकलंय या पॉडकास्टला हजेरी लावली. यावेळी "लग्न संस्थेवर किती विश्वास आहे?" असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर उत्तर देत सायली म्हणाली, "हा खूप अवघड प्रश्न आहे. पण जेव्हा मी माझे आई-बाबा किंवा अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांचं नातं पाहते, तेव्हा मला खूप विश्वास वाटतो. एकमेकांबद्दलची आपुलकी आणि नातं टिकवण्यासाठी त्यांचा प्रयत्न पाहिला की वाटत, हे खूप सुंदर आहे. ते एकमेकांसाठी सगळं करायला तयार असतात, पण मला नेहमी प्रश्न पडतो की हे सगळं माझ्याकडून होणार आहे का?", असं ती म्हणाली,

सायली म्हणाली, "मी आता इंडिपेंडेंट झालेय, त्यामुळे स्वतःहून काम करण्याची सवय झाली आहे. आणि ते फक्त काम म्हणून नाही, तर त्यामागे माझी एक पॅशन आहे. उद्या जर माझं लग्न झालं आणि कुणी मला म्हणालं की काम करू नको, तर ते मी सहन करू शकणार नाही. यामुळे मला कळतं नाही की माझा या लग्नसंस्थेवर विश्वास आहे की नाही. आता घडणाऱ्या गोष्टी पाहताना वाटतं की आधी आई-बाबांच्या काळात गोष्टी थोड्याशा सुटसुटीत होत्या. त्यांना पाहून लग्नसंस्थेवर विश्वास आहे असं वाटतं. पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. आपल्या आई-वडिलांसारखं सहज-सोप नातं असावं अशी अनेक मुलींची इच्छा असते. पण, तसं आता मिळतं नाही. माझ्या वयाच्या अनेक मुलींची हीच अवस्था असावी. त्यांना घर-संसार हवाच आहे, पण त्याचसोबत करिअरही करायचं आहे", असं सायलीनं म्हटलं. 

सायलीच्या 'समसारा'बद्दल बोलायचं झालं तर जन्म आणि मृत्यू यांच्या दरम्यान घडणारी एक गूढरम्य गोष्ट या चित्रपटात उलगडण्यात आली आहे.  सायली ही 'काहे दिया परदेस' मालिकेतून घराघरात पोहोचली होती. २०१६ ते १७ पर्यंत ही मालिका चालली. अभिनेता ऋषि सक्सेनासोबत सायलीची जोडी चांगलीच गाजली होती.  'समसारा'मध्येही सायलीसोबत ऋषि सक्सेना झळकला आहे. त्यामुळे या जोडीला पुन्हा एकदा एकत्र पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळाली आहे. 

टॅग्स :सायली संजीवलग्न