Join us

अंमली पदार्थांविरोधात रवी जाधवचा एल्गार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 13:04 IST

महाराष्ट्रातील बालगुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील बालगुन्हेगारीत सुमारे ५०० टक्के वाढ झाल्याचा धक्कादायक अहवालही एका संस्थेने ...

महाराष्ट्रातील बालगुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या दशकभरात महाराष्ट्रातील बालगुन्हेगारीत सुमारे ५०० टक्के वाढ झाल्याचा धक्कादायक अहवालही एका संस्थेने प्रसिद्ध केलाय. या बालगुन्हेगारीत वाढ होण्यामागे आपल्या समाजात घडणा-या गोष्टीसुद्धा तितक्याच कारणीभूत असतात. यावर प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता रवी जाधव याने चिंता व्यक्त केली आहे. बालक पालक, टाइमपास, टाइमपास-2 अशा सिनेमांमधून लहान मुलांचे भावविश्व रुपेरी पडद्यावर दाखवणा-या रवी जाधवने ठाण्यातील एक धक्कादायक वास्तव सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आणि यंत्रणांपुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ठाणे,पवई या परिसरात तरुण मुलं, मुली खुलेआम अंमली पदार्थांचे सेवन करत आहेत याकडे रवी जाधवने लक्ष वेधलं आहे.चायनीज विक्रेते,फुगे तसंच खेळणी विकणारे या अंमली पदार्थांचा पुरवठा करत असून पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी रवी जाधवने केली आहे. याशिवाय ठाण्यात वाढणारे हुक्का पार्लर आणि तिथे होणारी तरुणाईची गर्दी यावरही त्याने चिंता व्यक्त केली आहे. या संदर्भात पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवून ही विषवल्ली समाजात पसरु नये यासाठी काळजी घ्यावी असं आवाहनही त्याने केले आहे. या संदर्भात तात्काळ पोलिसांना माहिती देणे, सरकारवर विसंबून न राहता प्रत्येकाने पुढाकार घेत अशा गोष्टींना आळा घालण्याचे आवाहनही त्याने केलं आहे. मुलांच्या कट्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सक्षम आणि सुजाण पालकांचा कट्टा सुरु करण्याची सूचनाही रवी जाधवने केली आहे.त्यामुळे एका संवेदनशील दिग्दर्शकाचा समाजाकडे पाहण्याचा,समाजासाठी काही तरी करण्याचा दृष्टीकोन यानिमित्ताने समोर आला आहे. आता ठाण्यातील अंमली पदार्थांचे वाढणारे जाळे रोखण्यासाठी पोलीस आणि प्रशासन काय पाऊल उचलणार याकडं नजरा लागल्यात.मराठी चित्रपटांमध्ये मिळालेल्या यशानंतर रवी जाधव हिंदी चित्रपट सृष्टीकडे वळले.त्यांनी गेल्या वर्षी बँजो या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन केले. त्यांच्या या चित्रपटाचे देखील समीक्षक आणि प्रेक्षकांनी कौतुक केले होते.त्याचप्रमाणे त्यांच्या नव्या चित्रपटाचे नाव आगळे वेगळे असून या चित्रपटावर ते लवकरच काम करायला सुरुवात करणार आहेत. रंपाट असे त्यांच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे.