Join us

रांजण चित्रपटाच्या टीमने दिली लोकमत आॅफीसला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2017 16:53 IST

प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा रांजण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटाने पाच दिवसात ...

प्रेमाला कोणतंही बंधन नसतं असा विचार मांडणारा रांजण हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. या चित्रपटाने पाच दिवसात बॉक्सआॅफीसवर चांगली कमाई केली असल्याचे पाहायला मिळत आहे. या चित्रपटाच्या टीमने नुकतीच लोकमत आॅफीसला भेट दिली. यावेळी चित्रपटाचे दिग्दर्शक प्रकाश पवार, निर्माते रविंद्र हरपळे, यश कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, पुष्कर लोणारकर आदि कलाकार उपस्थित होते.       या चित्रपटाविषयी दिग्दर्शक प्रकाश पवार सांगतात, 'रांजण'मध्येही एका शाळकरी मुलगा आणि मुलगी यांच्यातील प्रेमकथा आहे. मात्र, ही कथा प्रेम, आकर्षण या भावनांच्या पलीकडे जाऊन एक सामाजिक विचार मांडते. मुलभूत गोष्टींवर भाष्य करते. मुलांचा समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोनही त्यातून व्यक्त होतो. त्यामुळे या चित्रपटाचा आनंद लहान मुलांसहित पालक ही घेऊ शकतात. तसेच या चित्रपटाच्या चित्रिकरणाचा अनुभव खूपच छान होता. एका नवीन विषयावर काम करण्यास मजा आली.         या चित्रपटाच्या माध्यमातून यश कुलकर्णी याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तो या चित्रपटाविषयी सांगतो, हा माझा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी मी अवतार या चित्रपटाच्या माध्यमातून विनोदी भूमिकेत झळकलो होतो. आता या चित्रपटातील माझी भूमिका वेगळी आहे. या चित्रपटातील माझी प्रतापची भूमिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. तसेच दिग्दर्शकाकडून खूप काही शिकण्यास मिळाले. या चित्रपटाचा अनुभव माझ्यासाठी खरचं खूपच छान आणि अविस्मरणीय होता.           रांजण या चित्रपटात प्रेक्षकांना या कलाकारांसहित भाऊ कदम, भारत गणेशपुरे, विदयाधर जोशी अशा तगडया कलाकारांचादेखील समावेश आहे. त्याचबरोबर या चित्रपटातील गाण्यांनी तर चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. 'लागीर झालं रं' या गाण्याला सोशल मीडियावर  मोठा प्रतिसाद मिळत आहे. वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गाण्याला नरेंद्र भिडे यांनी संगीतबद्ध केलं आहे. अजय गोगावले यांनी त्यांच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. गाण्याचे शब्द, संगीत आणि गाण्याचं चित्रीकरण यामुळे चित्रपटाला चार चाँद लागले आहेत. श्री महागणपती एंटरटेन्मेंटच्या रवींद्र कैलास हरपळे यांनी  या चित्रपटाची निर्मिती केली असून संवादलेखन प्रकाश पवार व नीलेश भोसले यांचं आहे.