गेल्या काही दिवसापासून मराठी मनोरंजन विश्वात एका चित्रपटाची चर्चा आहे. हा चित्रपट म्हणजे ‘गाडी नंबर १७६०’. जादुई प्रेमाच्या प्रवासाला स्पर्श करणारं ‘गाडी नंबर १७६०’ या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे पहिलं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. प्रेमात पडल्यावर मनात उमटणाऱ्या स्पंदनांना आणि गोड अनुभवांना स्पर्श करणारं हे गाणं प्रथमेश परब आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. या दोघांची फ्रेश आणि लोभसवाणी केमिस्ट्री गाण्याला एक वेगळाच लुक आणि फील देते.
या गाण्याला आशीष कुलकर्णी याचा सुरेल आवाज लाभला असून वैभव देशमुख यांच्या अर्थपूर्ण आणि हृदयस्पर्शी शब्दांनी गाणं अधिकच खुलून आलं आहे. गाण्याला मधुर आणि भावनिक संगीत दिलं आहे समीर सप्तीसकर यांनी, जे प्रेमभावनेला एका सुंदर चालीत गुंफून प्रेक्षकांच्या मनात झनकार निर्माण करतं. ‘झननन झाला’ या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन पवन-बॉब यांनी केलं आहे.
या गाण्याविषयी दिग्दर्शक योगीराज संजय गायकवाड म्हणतात, “प्रेमात पडल्यावर मनात उमटणाऱ्या भावना शब्दांत मांडणं कठीण असतं. पण ‘झननन झाला’ गाणं त्या भावना प्रेक्षकांपर्यंत अगदी सुंदरपणे पोहोचवतं. या गाण्यात केवळ रोमँटिक क्षण नाहीत, तर त्यामागील नाजूक भावना, गोंधळलेलं मन, आणि त्या पहिल्या प्रेमाची धडधडही आहे. गाण्याचं शब्द, संगीत आणि अभिनय यांची सांगड इतकी सुंदरपणे बसली आहे की, प्रेक्षक गाण्याच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्या प्रवासात सामील होतात.''
तन्वी फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते कैलाश सोराडी आणि विमला सोराडी आहेत, तर लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा योगिराज संजय गायकवाड यांनी सांभाळली आहे. येत्या ४ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात या चित्रपटात प्रथमेश परब, शुभंकर तावडे, प्रियदर्शिनी इंदलकर, सुहास जोशी, प्रसाद खांडेकर, श्रीकांत यादव आणि शशांक शेंडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
तर चित्रपटाचे निर्माते कैलाश सोरडी म्हणतात, '' या चित्रपटातील ‘झननन झाला’ हे गाणं आजच्या पिढीच्या प्रेमाच्या भावना अत्यंत प्रभावीपणे दाखवतं. आम्हाला खात्री आहे की हे गाणं प्रत्येकाच्या हृदयात आपलं स्थान निर्माण करेल. 'झननन झाला’ या गाण्याद्वारे आम्ही प्रेक्षकांना प्रेमाच्या त्या गोडस्पर्शी जागा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या गाण्यातली प्रत्येक फ्रेम, प्रत्येक क्षण प्रेमाने भरलेला आहे. जेव्हा आम्ही हे गाणं पाहिलं, तेव्हा आम्ही जाणवलं, की हे गाणं फक्त ऐकण्यासाठी नाही, तर अनुभवण्यासाठी आहे. आम्ही अत्यंत मेहनतीने आणि मनापासून हे गाणं सादर केलं आहे. मला खात्री आहे हे गाणं संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.''