पल्लवी जोशी प्रेक्षकांना दिसणार एका वेगळ्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 17:36 IST
पल्लवी जोशीने एक अभिनेत्री, निर्माती म्हणून तिचे एक वेगळे स्थान बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये निर्माण केले आहे. त्यामुळे तिचा ...
पल्लवी जोशी प्रेक्षकांना दिसणार एका वेगळ्या भूमिकेत
पल्लवी जोशीने एक अभिनेत्री, निर्माती म्हणून तिचे एक वेगळे स्थान बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये निर्माण केले आहे. त्यामुळे तिचा आगामी प्रोेजेक्ट कोणता असणार याविषयी प्रेक्षकांना नेहमीच उत्सुकता असते. आता पल्लवी पुन्हा एकदा प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पल्लवी आता एका चित्रपटाची निर्मिती करणार असून ती या चित्रपटात एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. याविषयी पल्लवीने नुकतेच सांगितले आहे. पल्लवीचा चित्रपट हा लालबहाद्दूर शास्त्री यांच्यावर आधारित आहे. या चित्रपटाविषयी सीएनएक्सशी बोलताना पल्लवीने सांगितले, लालबहाद्दूर शास्त्री यांच्या आयुष्यावर हा चित्रपट नाहीये. त्यांचा हा बायोपिक नसून केवळ त्यांचा मृत्यू हा कशा पद्धतीने झाला हा या चित्रपटाचा विषय आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता की त्यांना विष देण्यात आले या गोष्टीवर आजही एकमत झालेले नाही. हाच विषय मी माझ्या चित्रपटात मांडला आहे.पल्लवीने आजवर आरोहण, अल्पविराम, जुस्तजू यांसारख्या मालिकांमध्ये खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिच्या आजवरच्या कारकिर्दीत एकाहून एक सरस भूमिकांमध्ये आपल्याला तिला पाहायला मिळाले आहे. तसेच तिने अनेक चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कारने देखील सन्मानित करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पल्लवी छोट्या पडद्यापासून दूर होती. पण तिने मेरी आवाज ही पहचान है या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर कमबॅक केला. तिच्या कमबॅकविषयी सीएनएक्सशी बोलताना तिने सांगितले होते की, मेरी आवाज ही पहचान है ही मालिका केवळ काहीच भागांची असल्याने मी या मालिकेचा भाग व्हायचे ठरवले. आजच्या मालिका, चित्रीकरणाची पद्धत सगळे काही बदललेले आहे. १५-२० वर्षांपूर्वी अनेक निर्माते मालिकांचे चित्रीकरण करण्याआधी वर्कशॉप घेत असत. तसेच अनेक बारीक बारीक गोष्टीही प्रत्येक कलाकाराला समजावून सांगितल्या जात असत. पण आता कोणालाच या गोष्टींसाठी वेळ नाहीये. त्यावेळी मालिकाही खूप कमी भागांच्या असायच्या. त्यामुळे मालिकेची संपूर्ण कथा, व्यक्तिरेखा शेवटपर्यंत मालिकेत कशाप्रकारे दाखवली जाणार याची आम्हा कलाकारांना कल्पना असायची. आज खूप गोष्टी बदलल्या आहेत. पण तरीही माझा काम करण्याचा अनुभव वाईट होता असे कधीच मी म्हणणार नाही. मी मालिकेत काम करत नसले तरी दरम्यानच्या काळात मी मराठी मालिकांची निर्मिती केली. तसेच सारेगमपा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. Also Read : पल्लवी जोशी म्हणतेय, ‘पुनर्जन्म, बालविवाहऐवजी इतिहासाची शौर्यगाथा दाखवा'