‘निर्भया’ तरुणींना नवचेतना देईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 17:01 IST
आज स्त्रिया जरी प्रत्येक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या एक पाऊल पुढे असल्या तरी त्यांच्यावरील अत्याचाराचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. आजही ...
‘निर्भया’ तरुणींना नवचेतना देईल
आज स्त्रिया जरी प्रत्येक क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या एक पाऊल पुढे असल्या तरी त्यांच्यावरील अत्याचाराचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. आजही पावलोपावली त्यांना वखवखलेल्या नजरांचा सामना करावा लागत आहे. यातून ज्या बचावतात त्या सुटकेचा नि:श्वास सोडत स्वत:चा संसार सांभाळण्यात रमतात, पण ज्या नराधमांच्या अत्याचारांना बळी पडतात त्या एकतर स्वत:चं आयुष्य संपवतात नाहीतर तोंडातून शब्द न काढता मुकाट्याने आपली वाटचाल करीत राहतात. या परिस्थितीतही अत्याचाराविरोधात ज्या बंड पुकारतात त्या ‘निर्भया’ समाजासमोर नवा आदर्श निर्माण करतात. अशाच एका तरुणीची कथा सांगणारा ‘निर्भया’ हा चित्रपट ६ ऑक्टोबरपासून सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.दिग्दर्शक आनंद बच्छाव यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘निर्भया’ची निर्मिती अमोल अहिरराव यांनी केली असून, हा चित्रपट स्वानंदी प्रोडक्शनची प्रस्तुती आहे. खरं तर कॉलेज जीवनात वावरत असल्यापासूनच तरुणींवर होणाऱ्या अत्याचारा विरोधात बच्छाव यांच्या मनात चीड होती. दिग्दर्शनाकडे वळल्यानंतर मनातील ही चीड चित्रपटाच्या माध्यमातून व्यक्त करावी आणि त्यातून आजच्या तरुणींनी नवचेतना मिळावी या उद्देशाने त्यांनी ‘निर्भया’ हा चित्रपट बनवला आहे. बऱ्याच तरुणी रोड रोमियोंकडे दुर्लक्ष करतात त्यामुळेच त्यांना बळ मिळतं आणि नंतर हेच रोमियो तरुणींवर अत्याचार करायलाही मागेपुढे पाहात नाहीत. तरुणींनी जर वेळीच प्रतिकार केला, तर अत्याचाऱ्यांना योग्य शासन घडेल असं नेहमी वाटायचं. यातूनच ‘निर्भया’ या चित्रपटाची संकल्पना समोर आली. या चित्रपटात अभिनेत्री योगिता दांडेकरने साकारलेली निर्भया अत्याचार झाल्यानंतर न्याय व्यवस्थेकडे दाद मागते, पण तिला अपयश येतं. राजकारण्यांच्या दारीही तिच्या पदरी नैराश्यच येतं. त्यामुळे आरोपींना धडा शिकवण्यासाठी ती व्यवस्थेविरोधात बंड पुकारते. योगिताने निर्भयाच्या व्यक्तिरेखेला अचूक न्याय दिल्याने चित्रपट पाहताना तो प्रेक्षकांच्या हृदयाला नक्कीच भिडेल. ALSO READ : योगिता दांडेकर बनली ‘निर्भया’संतोष हुदलीकर यांनी ‘निर्भया’ची कथा लिहिली असून, पटकथा-संवादलेखन डॉ. मुरलीधर भावसार यांनी केलं आहे. योगिता दांडेकरला या चित्रपटात स्मिता जयकर, किशोर महाबोले, अनिकेत केळकर, अभिजीत कुलकर्णी, ओंकार कर्वे आदि कलाकारांची साथ लाभली आहे. विनोद चौरसिया यांनी संकलन केलं असून, छायांकन मनिष पटेल यांचं आहे. नितीन पाटील या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.