Join us

'आता थांबायचं नाय' चित्रपट कसा वाटला? अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रतिक्रिया, म्हणाली-"अत्यंत महत्त्वाचा विषय..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 11:34 IST

'आता थांबायचं नाय' चित्रपट सोनाली कुलकर्णीला कसा वाटला? अभिनेत्री म्हणाली...

Sonalee Kulkarni:सध्या मराठी मनोरंजनविश्वात 'आता थांबायचं नाय' या चित्रपटाची चर्चा सुरु आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१६ साली घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट काल १ मे या दिवशी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भरत जाधव ओम भूतकर आणि प्राजक्ता हनमघर यांसारख्या कलाकारांची मांदियाळी आहे. शिवराज वायचळ दिग्दर्शित या चित्रपटाचं सगळेजण कौतुक करताना दिसत आहेत. याच चित्रपटाविषयी लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) खास पोस्ट शेअर करत भरभरुन कौतुक केलं आहे. 

सोनाली कुलकर्णीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आता थांबायचं नाय चित्रपटाबाबत पोस्ट लिहून तिला हा चित्रपट कसा वाटला याबद्दल सांगितलं आहे. सोनालीने या पोस्टमध्ये लिहिलंय की, "हा “महाराष्ट्र दिन” आणि “कामगार दिन” संपूर्ण पणे सार्थकी ठरला. तपशील सांगायला खूप आहे पण दहावी, बारावी, पदवीधर परिक्षा वगैरे उत्तीर्ण केल्यानंतरही नेमके, थेट शब्द सापडत नाहीयेत खऱ्या भावना व्यक्त करायला त्या इतक्या ओसंडून वाहताहेत की आता बोलून, लिहून त्या थांबवायच्या नाहीयेत. तरी त्या वाहणाऱ्या भावनांवर पुल म्हणून ही पोस्ट." 

यापुढे दिग्दर्शक शिवराज वायचळचं कौतुक करताना सोनालीने पोस्ट्द्वारे म्हटलंय, "मराठी चित्रपटसृष्टीचं भवितव्य उज्ज्वल आहे हे नक्की. @shivrajwaichal @o.gokhale अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत संवेदनशीलपणे, समजून आणि समजावून मांडल्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेवढे कमी. संहिता, संवाद, मांडणी, संगीत, छायाचित्रण, पार्श्वसंगीत, सगळ्याच बाजू चपखल जमल्या आहेत, आणि सगळ्याच कलाकारांचा अभिनय, अभिनय वाटंतच नाही, आपण या “characters” ची ही अत्यंत कमालीची गोष्ट पाहतोय असं वाटत राहतं. P.S. हा मराठी चित्रपट “चित्रपटगृहात” सहकुटुंब पाहायलाच हवा… ही आपली “नैतिक” जबाबदारी आहे. त्यातून चित्रपट पाहिल्यावर आपल्या “नागरिक” म्हणून आपल्या अशा अनेक जबाबदाऱ्यांची जाणीवही नक्कीच होईल." अशी पोस्ट लिहून सोनाली कुलकर्णीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

बीएमसी कामगार आणि त्यांच्या असंख्य मूक वेदनांना आवाज फोडणारी ही फिल्म, सत्य घटनेवर आधारित आहे. नापास कर्मचारी दहावीच्या परीक्षेत पास होण्यापर्यंतचा प्रवास शिवराज वायचळ यांनी रंजकतेने पडद्यावर मांडला आहे. 

टॅग्स :सोनाली कुलकर्णीमराठी चित्रपटभरत जाधवसिद्धार्थ जाधवसेलिब्रिटी