Join us

किशोरी गोडबोलेंना आई-बाबांनी दिलेला 'हा' महत्वाचा सल्ला, म्हणाल्या- "कधी टीका झाली तरी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 12:53 IST

"कधी अपयश आलं टीका झाली...", अभिनेत्री किशोरी गोडबोले नेमकं कशाबद्दल बोलतीये? 

Kishori Godbole: अभिनेत्री किशोरी गोडबोले (Kishori Godbole) हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय असं नाव आहे. वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये विविध धाटणीच्या भूमिका साकारुन अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. खबरदार, फुल थ्री धमाल, माझा नवरा तुझी बायको,  वन रुम किचन यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. त्यात आता अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्रीने केलेल्या एका वक्तव्यामुळे ती चर्चेत आली आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी किशोरी गोडबोलेंना आई-वडिलांनी जो सल्ला दिला होता, तोच सल्ला त्यांनी आपल्या लेकीला दिला आहे, याबद्दल सांगितलं आहे. 

नुकतीच किशोरीने तिची लेक सई गोडबोलेसह 'लोकमत फिल्मी'च्या सेलिब्रिटी किड्स या विशेष कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीमध्ये अभिनेत्री म्हणाली, "जेव्हा या क्षेत्रामध्ये यायचा निर्णय मी घेतला तेव्हा माझ्या आई-वडिलांनी मला जे सांगितलं तेही मी तिला सांगितलं ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा (Balance) तोल. म्हणजे खूप कौतुक झालं खूप यश मिळालं तरी हुरळून जायचं नाही आणि कधी अपयश आलं टीका झाली तरी खचून जायचं नाही आपण स्वतःला नेहमीच अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा."

पुढे ती म्हणाली, "कितीही टीका होऊ दे कितीही यश मिळू दे आपण या क्षेत्रात का आलो आहोत? हे कधी विसरायचं नाही कारण कलेची सेवा करायला आपण आलेलो आहोत, आपल्याला मनापासून आवड आहे या कलेबद्दल, या गुणांबद्दल म्हणून इथे आलोय. एवढंच मी तिला सांगितलं की, तोल सगळ्यात महत्त्वाचा. कारण आपण म्हणतो ना की, अगं! थोडा तब्येतीचा तोल बिघडला आणि मी आजारी पडले. तोल बिघडू नाही द्यायचा, म्हणून आयुष्यात तोल (Balance) सगळ्यात महत्त्वाचा आहे." असं म्हणत अभिनेत्रीने तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या. 

टॅग्स :किशोरी गोडबोलेसेलिब्रिटी