Join us

लसणाच्या पाकळ्या खाऊन दिवस काढायचा 'हा' अभिनेता; काम पाहून निळू फुलेंनी केलेलं कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:26 IST

लसणाच्या पाकळ्या खाऊन दिवस काढायचा 'हा' अभिनेता! मराठीतील खलनायकाची स्टोरी वाचून डोळे पाणावतील

Marathi Actor:मराठी चित्रपटसृष्टी ही अस्सल कलावंतांची खाण असल्याचं म्हटलं जातं. बहुतांशी ते खरंही आहे. चित्रपटसृष्टीतील असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे अभिनेते चंदु पारखी. मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीसह नाटक आणि छोटा पडदा गाजवणाऱ्या या हरहुन्नरी नायकाने कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण केली. शरीरयष्टी बारीक असली तरी चेहर्‍याने खलनायकाचा भेसूरपणा उभा करणारे नाट्य,चित्रपट अभिनेते चंदू पारखी यांचं नाव आजही मोठ्या अदबीने घेतलं जातं.

अभिनेते चंदू पारखी यांचा जन्म १७ डिसेंबर १९४७ मध्ये इंदूरमध्ये झाला. मात्र, त्यांचं आयुष्य हे काट्याकुट्याने भरलेल्या रस्त्याप्रमाणेच होते.अभिनय हे आपल्या चरितार्थाचे साधन म्हणून वापरायचे असेल, तर इंदौरहून मायानगरी मुंबई गाठल्याशिवाय पर्याय नाही. मराठी चित्रपटसृष्टीतील दुसरे निळू फुले अशी त्यांची ओळख होती. निष्पाप’ हे त्यांचं पहिलं नाटकं. या नाटकाने त्यांना ‘अभिनेता’ अशी ओळख मिळवून दिली आणि इथून पुढे त्यांना नाटकं, चित्रपट, मालिका मिळत गेल्या. निष्पाप’च्यानंतर ’माझा खेळ मांडू दे’, ‘अशी ही फसवा फसवी’ या नाटकांसोबतच त्यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून कधी विनोदी, तर कधी खलनायकी भूमिका साकारल्या. ‘जसा बाप तशी पोरं’, ‘खट्याळ सासू नाठाळ सून’, सर्वश्रेष्ठ, ‘बाप रे बाप’, ‘कळत नकळत’, ‘बलिदान’, ‘वाजवा रे वाजवा’, या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका चांगल्या गाजल्या. विशेष म्हणजे “माझी जागा कोणी घेईल, तर तो चंदू पारखीच असेल,” असं चंदू पारखी यांचं कौतुक स्वतः निळू फुले यांनी केलं होतं.

लसणाच्या पाकळ्या खाऊन काढले दिवस...

याचदरम्यान, त्यांचा त्यांचा राहण्याचा, जेवण्याखाण्याचा खर्च कसाबसा सुटत होता. पण, कधी कधी उपासमारीची वेळ यायची जेवणासाठी पैसे नसायचे. मग त्यांनी एक शक्कल लढवली, मात्र, त्याचा परिणाम हा त्यांच्या आरोग्यावर झाला. पोटात उसळणारी भूकेची आग शमवण्यासाठी ते आपल्या झब्ब्याच्या खिशात दहा-बारा लसणाच्या पाकळ्या घेऊन फिरायचे. एकदा भूक लागली की खिशातल्या चार-पाच लसणाच्या पाकळ्या काढायचे, त्या खायचे आणि त्यावर ग्लासभर पाणी प्यायचे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणा झाला आणि ते प्रचंड आजारी पडले. अभिनयाची अनोखी लकब आणि शैली या वैशिष्ट्यगुणांमुळे आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यात ते यशस्वी झाले होते. हा प्रवास चालू असतानाच १४ एप्रिल १९९७ रोजी या कलाकाराने जगाच्या रंगमंचावरून एक्झिट घेतली.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटसेलिब्रिटी