Mira Jagannath: मीरा जगन्नाथ (Mira Jagannath) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने तिचा भलामोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. वेगवेगळ्या मराठी मालिका तसेच चित्रपटांमधून काम करुन मीराने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. शिवाय 'बिग बॉस' मराठीच्या तिसऱ्या पर्वातही ती झळकली. सध्या 'इलू इलू' चित्रपटामुळे तिची सर्वत्र चर्चा होताना दिसतेय. याच दरम्यान अभिनेत्रीने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आपल्या वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं आहे.
नुकतीच मीरा जगन्नाथने 'नवशक्ती'ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये अभिनेत्रीला प्रेमात केलेला सर्वात मोठा वेडेपणा कोणता? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मीरा म्हणाली, "काही वर्षांपूर्वी माझं लग्न ठरलं होतं आणि तो मुलगा लग्न करण्यासाठी भारतात आला. आधी माझा साखरपुडा ठरला त्यानंतर एका आठवड्यानंतर लग्न होतं. त्यावेळी साखपुड्याच्या दिवशी माझा जो बॉयफ्रेंड होता तो सहा महिन्यांनी माझ्या आयुष्यात परत आला. त्याला लग्न करणं जमत नव्हतं म्हणून मी त्याला म्हटलं होतं की ठीक आहे, तुला नाही जमत तर मी आयुष्यात पुढे जाते. सहा महिन्यानंतर तो परत आला आणि मला विमानतळावरचे फोटो पाठवले आणि म्हणाला की, मी इथे आलो आहे तू लग्न करू नकोस. त्याने असं म्हटल्यानंतर मी साखरपुडा मोडला."
पुढे अभिनेत्री म्हणाली, "या गोष्टीमुळे माझे बाबा खूप चिडले. मग मी पुन्हा मुंबईमध्ये आले, त्यानंतर तो मुलगा परत गायब झाला."असा धक्कादायक खुलासा मीराने मुलाखतीमध्ये केला.
अभिनेत्री मीरा जगन्नाथच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर लवकरच ती 'इलू इलू' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे तिचे चाहते उत्सुक आहेत. फाळके फिल्म्स एण्टरटेन्मेंट प्रॉडक्शन आणि अजिंक्य बापू फाळके दिग्दर्शित 'इलू इलू' ३१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.