१९८७ साली प्रेमासाठी वाट्टेल ते हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला होता. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सुधीर जोशी, पद्मा चव्हाण, कांचन अधिकारी, प्रकाश भेंडे आणि उमा भेंडे हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाची निर्मिती उमा प्रकाश भेंडे आणि दत्ता केशव यांनी दिग्दर्शन केले होते. या चित्रपटात रतनची भूमिका अभिनेत्री आणि निर्माती कांचन अधिकारी यांनी साकारली होती.
कांचन अधिकारी यांनी ‘बबन प्रभू’ लिखित ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातून व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण केले. या पहिल्याच नाटकामुळे त्यांना भक्ती बर्वे, आत्माराम भेंडे, दिलीप प्रभावळकर, माधव वझे या कलाकारांसह काम करण्याचा अनुभव मिळाला. या नाटकातील भूमिकेमुळे ‘प्रेमासाठी वाट्टेल ते’ या प्रकाश भेंडे यांच्या चित्रपटात त्यांना संधी मिळाली. अशोक सराफ या दिग्गज कलाकाराबरोबर नायिका म्हणून या चित्रपटात काम केले.
कांचन अधिकारी यांनी मराठी चित्रपटांबरोबरच हिंदी चित्रपटातही भूमिका केल्या. दादा कोंडके यांच्या ‘आगे की सोच’ या हिंदी चित्रपटात शक्ती कपूर, स्वप्ना या कलाकारांबरोबर सहजतेने अभिनय केला. ‘ये जो है जिंदगी’, ‘बनते बिगडते’, ‘और भी है राहें’, ‘तितलियॉं’ यासारख्या हिंदी मालिकांमध्ये अभिनय केलाच, शिवाय ‘अभी तो मै जवान हूॅं’, ‘संबंध’, ‘डोली लेके आयी है दुल्हनियॉं’, ‘हॅंसी वो फसी’ या हिंदी मालिकांचे दिग्दर्शनही केले.