'आई कुठे काय करते' मालिकेत मुख्य भूमिका साकारून अभिनेत्री मधुराणी गोखले सर्वांची लाडकी अरुंधती झाली. मालिका संपल्यानंतरही सोशल मीडियाच्या माध्यमातून मधुराणी प्रेक्षकांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. नुकतंच मधुराणीने एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत मधुराणीने लग्न आणि डेटिंग यावर चर्चा केली.
मधुराणीने आरपार युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत लग्न आणि डेटिंगवर तिचं मतं मांडलं. ती म्हणाली, "मुलगी म्हणून मोठी होताना मी जे काही चित्रपट बघितले ते असे होते की मेरे ख्वाबों में जो आए...आ के मुझे छेड जाए... त्यामुळे आमच्या पिढीला जवळपास हेच वाटत होतं की वयात आल्यावर स्वप्नातला राजकुमार आपल्याला भेटणार आणि त्याच्याशी लग्न करायचं. झालं मग लाइफ सेट...पण, त्या मुलीला त्या काळात कोणीच विचारलं नाही की बाई गं तुला काय आवडतं? तुझं काय म्हणणंय. बरं ते निर्णय इतक्या नाजूक वयात घेऊन टाकले...कारण तेव्हा असंच होतं की जो आवडेल त्याच्यासोबतच लग्न केलं पाहिजे".
पुढे ती म्हणाली, "आजकाल डेटिंग अॅप्स आहेत. आणि एक कॅज्युएल डेटिंग वगैरे असतं. आमच्या वेळेला असं काही नव्हतं. ज्याच्याबरोबर डेट करू त्याच्याशी लग्न केलंच पाहिजे. आणि त्यावेळेला काय एक्सपोजर...काहीच कळत नसतं. समाज कसा चालतो? जग कसं चालतं? काही माहीत नसतं...आणि त्या वयात दोघं जण एकत्र येतात आणि बिचाऱ्यांवर कम्प्लशन असतं की हे पुढे नेलंच पाहिजे. आणि या सगळ्यात एका विशिष्ट जनरेशनने खूप घुस्मटलेली सिस्टिम पाहिलीये. ही हिपोक्रिसी आपण बघतो की आईवडिलांचं अजिबात पटत नाहीये. पण, चार लोकात दाखवतात की आमचं किती सगळं छान चाललंय".