Join us  

पावसाची अक्कल काढत केदार शिंदे यांनी बीएमसीला मारला टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 7:28 PM

केदार शिंदे यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल झाले आहे.

ठळक मुद्देपावसाला अक्कल नाही असे ट्वीट करत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रशासनाला उपहासात्मक टोला लगावला आहे.

पहिल्याच पावसात मुंबई व उपनगरांत पाणी तुंबल्याने विरोधकांनी मुंबई महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं. भाजपने तर नालेसफाईचा दावा फोल ठरला असून यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. मुंबई जलमय झाली आहे. या सगळ्यात पावसाला अक्कल नाही असे ट्वीट करत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी प्रशासनाला उपहासात्मक टोला लगावला आहे.

केदार शिेंदे यांनी ट्वीट करून त्यात लिहिले आहे की, पावसाला एक अक्कल नाही. ५० मीमी पर्यंत संरक्षणाची व्यवस्था बीएमसीने केली होती. हा नेहमी जास्त पडून तुंबई करतो. 

केदार शिंदे यांचे हे ट्वीट सोशल मीडियावर चांगेलच व्हायरल झाले असून त्यात नवीन काय? वर्षानुवर्षे हेच तर चालू आहे की मग याच वर्षी अपेक्षा का? अशाप्रकारच्या प्रतिक्रिया नेटिझन्स देत आहेत.

मुंबईत पाणी तुंबल्यानंतर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी रस्त्यावर उतरून परिस्थितीची पाहणी केली. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. "साधारणपणे २४ तासांत १६५ मिमी पाऊस झाला तर अतिवृष्टी होते असं मानतो. परंतु, मुंबईत आतापर्यंत १४० ते १६० मिमी पाऊस झाला आहे. तसेच अवघ्या तासाभरात ६० मिमी पाऊस झाला आहे. एकट्या सायन-दादर परिसरात १५५ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबलं आहे", असं इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं.

मुंबईत १०७ टक्के आणि १०४ टक्के नालेसफाईचे दावे पहिल्याच पावसाच फोल ठरले असल्याचा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला. तर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनीही मुंबईत पाणी तुंबणार नसल्याच्या शिवसेनेचा दावा सपशेल खोटा ठरल्याचं नमूद केलं. त्यावर प्रत्युत्तर देताना महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईत पाणी तुंबणार नाही असा दावा कधीच केला नाही आणि करणार देखील नाही, असं म्हटलं आहे. मुंबईतील नाले ते समुद्राच्या तळाशी आहेत. त्यामुळे मुंबईत पाणी तुंबणार नाही असं कुणीच दावा करू शकत नाही. पण साचलेल्या पाण्याचा चार ते पाच तासांत निचरा होईल अशी व्यवस्था करण्यात आलेली आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

टॅग्स :केदार शिंदेमुंबईत पावसाचा हाहाकार