बॉलिवूड अभिनेता इमरान खानने पत्नी अवंतिका मलिकपासून घटस्फोट घेत ८ वर्षांचा संसार मोडला. २०११ मध्ये इमरान आणि अवंतिकाने लग्न केलं होतं. २०१९ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते. त्यांना एक मुलगीदेखील आहे. घटस्फोटानंतर आता पहिल्यांदाच इमरानची एक्स पत्नी अवंतिकाने याबाबत भाष्य केलं आहे. अवंतिका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर बोलली.
अवंतिकाने सेक्विएराला दिलेल्या मुलाखतीत घटस्फोट ही जगातील सगळ्यात वाईट गोष्ट नसल्याचं म्हटलं आहे. त्याबरोबरच घटस्फोट झाला तर माझी जीव जाईल, असं वाटतं असल्याचा खुलासाही तिने केला.
घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली इमरान खानची Ex पत्नी
"घटस्फोट म्हणजे फक्त दोन व्यक्तींचं एकमेकांपासून वेगळं होणं आहे. ही जगातील सगळ्यात वाईट गोष्ट नाहीये. मला असं वाटायचं की घटस्फोट झाला तर मी मरून जाईन. इमरान शिवाय एक दिवसही जगू शकणार नाही, असं मला वाटायचं. मला वाटायचं की माझा जीव जाईल. मी खूप घाबरले होते. कारण, त्यावेळी माझी स्वत:ची अशी कमाई नव्हती. मी आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हते. मी एका चांगल्या कुटुंबात वाढलेली असल्यामुळे रस्त्यावर तर राहू शकत नव्हते".
घटस्फोट घेण्याआधी आम्ही काही वेळ वेगळं राहण्याचा निर्णय घेतला होता. हे सगळं कोव्हिड दरम्यान घडलं. माझ्या आईवडिलांचाही घटस्फोट झालेला आहे. त्यामुळे याबाबत त्यांच्याशी बोलणं कठीण नव्हतं. ही गोष्ट आमच्यासाठी लाजिरवाणी नव्हती. आम्ही १९ वर्षांचे असताना एकमेकांना भेटलो होतो. जेव्हा तुम्ही इतका वेळ एकत्र असता तेव्हा एकमेकांवर खूप जास्त अवलंबून असता. मला विमानाचे तिकीटही बूक करता येत नव्हते. एका सेलिब्रिटीसोबत माझं लग्न झालं होतं. आमच्या मुलीला सुरुवातीला खूप प्रश्न पडायचे. ती विचारायची की मला नवीन आई भेटणारे का? मी तिला सांगायचे की नाही, तू माझ्यासोबत राहणार आहेस.