मराठीतील 'पुन्हा साडे माडे तीन' आणि 'रणपति शिवराय स्वारी आग्रा' हे दोन मोठे सिनेमे येत्या ३० जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहेत. सुरुवातीला दिग्पाल लांजेकरांचा 'रणपति शिवराय' हा ऐतिहासिक सिनेमा १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार होता. मात्र अचानक सिनेमाची रिलीज डेट बदलून ३० जानेवारी करण्यात आली. याबाबत 'पुन्हा साडे माडे तीन'चे निर्माते आणि मनसे नेते अमेय खोपकर यांनी दिग्पाल लांजेकर यांच्यावर आरोप केले होते. दिग्पाल लांजेकरने आगाऊपणा केला असं म्हणत त्यांना बॅन करण्याची मागणी अमेय खोपकर यांनी केली होती. फोनवर चर्चा होऊनही सिनेमाची तारखी बदलली नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. अमेय खोपकर यांच्या या आरोपांवर आता दिग्पाल लांजेकर यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.
दिग्पाल लांजेकर म्हणाले, "हा संपूर्णपणे निर्मात्यांचा भाग आहे. अमेय खोपकर यांचा बहुदा काहीतरी गैरसमज झालेला असावा. आमचं फोनवर बोलणं झालं होतं तेव्हाही मी त्यांना हे स्पष्ट केलं होतं की चित्रपटाचा निर्माता मी नाही. सिनेमाचा दिग्दर्शक आणि लेखक मी आहे. अर्थातच दोन मोठे मराठी सिनेमे समोरासमोर येऊ नयेत याच मताचा मी आहे. आमच्या मुक्ताई या सिनेमाची रिलीज डेट मराठी सिनेमांना न्याय मिळावा म्हणून सहा वेळा बदलण्यात आली होती. सुभेदार सिनेमा तीन वेळा पोस्टपोन केला होता. त्यामुळे मराठी सिनेमाच्या हितासाठी तारीख बदलायला माझा कधीच नकार नसतो. यावेळेसही माझी भूमिका तीच आहे. दोन निर्मात्यांनी मिळून ठरवलं तर कोणत्याही चांगल्या तारखेला हा सिनेमा प्रदर्शित व्हावा. पण, हा निर्मात्यांनी घ्यायचा निर्णय आहे. माझं काम हे फक्त सिनेमा बनवणं आणि तो त्यांच्यामार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आहे".
"आम्ही फक्त छत्रपतींचे सिनेमे करतो. आम्ही जर मराठी भाषा टिकवण्यासाठी सिनेमे करतोय तर मराठी सिनेमा टिकवण्यासाठी का नाही प्रयत्न करणार? सगळ्यांनी योग्यरितीने चर्चा करून तारीख ठरवावी, असं माझं मत आहे. प्रत्येक निर्मात्याने त्याच्या व्यवसायाच्या अनुषंगाने तारीख ठरवलेली असते. फेब्रुवारीमध्ये बोर्डाच्या परिक्षा सुरू होत्यात. त्यामुळे सिनेमाची तारीख बदलण्यात आली आहे. हा सिनेमा नव्या पिढीने बघणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यामुळे सिनेमाची तारीख अलिकडे घेण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता, असं मला निर्मात्यांनी सांगितलं. याबाबत मी निर्मात्यांशी एका मर्यादेपर्यंतच चर्चा करू शकतो. त्यानंतर माझी व्यावसायिक मर्यादा मला सांगते की मी निर्मात्यांच्या मताचा आदर केला पाहिजे", असंही ते पुढे म्हणाले.
अमेय खोपकर नेमकं काय म्हणाले होते?
दिग्पाल लांजेकरांवर टीका करताना अमेय खोपकर म्हणाले होते की "पुन्हा साडे माडे तीन सिनेमाची तारीख इतर मराठी सिनेमांसाठी मी तीन आठवडे पुढे ढकलली. मात्र दिग्पाल लांजेकरने त्याच्या १६ फेब्रुवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'रणपति शिवराय' या सिनेमाची रिलीज डेट अचानक बदलत ३० जानेवारी केली. याबद्दल त्याने कुणालाही विचारलं किंवा सांगितलं नाही. मी त्याला फोन करत तुमच्या सिनेमाची तारीख बदला असं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर त्याने माझा एकही कॉल उचललेला नाही. पण मी याचा निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा आहे म्हणून मी गप्प आहे. पण, काही निर्माते खरंच शेफारले आहेत. त्यांची मस्ती उतरवली पाहिजे. दिग्पाल लांजेकरनेही असाच आगाऊपणा केला आहे. निर्माता संघ आणि मंडळाला सांगावं लागेल की त्याला बॅन करावं".
Web Summary : Digpal Lanjekar clarified that the release date change of 'Ranapati Shivray' was the producer's decision. He prioritizes Marathi cinema's welfare and is open to date adjustments through producer consensus, citing board exams as the reason for the change.
Web Summary : दिग्पाल लांजेकर ने स्पष्ट किया कि 'रणपति शिवराय' की रिलीज की तारीख बदलना निर्माता का निर्णय था। वे मराठी सिनेमा के कल्याण को प्राथमिकता देते हैं और निर्माता सहमति से तारीख समायोजन के लिए तैयार हैं, उन्होंने बोर्ड परीक्षाओं को बदलाव का कारण बताया।