पंजाबी सुपरस्टार आणि लोकप्रिय गायक दिलजीत दोसांझच्या (Diljit Dosanjh) 'सरदारजी ३' चित्रपटाची सध्या खूप चर्चा आहे. या चित्रपटात तो पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत एकत्र काम करत असल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'सरदारजी ३' भारतात प्रदर्शित झाला नसला तरीही पाकिस्तानी अभिनेत्रीसोबतच्या सिनेमाला प्रमोट केल्याने दिलजीतवर दिलजीतवर टीका झाली. अशीही चर्चा सुरू होती की दिलजीतला त्याच्या 'बॉर्डर २' चित्रपटातून काढून टाकण्यात आलं आहे. अशातच आता 'बॉर्डर २'मध्ये दिलजीतच्या कास्टिंगबाबत मोठं अपडेट आलं आहे.
'बॉर्डर २' या बहुप्रतिक्षित चित्रपटातून दिलजीत वगळण्यात येणार आणि त्याच्या जागी एमी विर्क घेणार असल्याचं बोललं जात होतं. विशेष म्हणजे FWICE (Federation of Western India Cine Employees) ने देखील सनी देओलला पत्र लिहून या कास्टिंगवर पुनर्विचार करण्याची विनंती केल्याची चर्चा होती. 'बॉर्डर २' सारख्या देशभक्तीपर चित्रपटात दिलजीतसोबत काम करण्याचा पुनर्विचार करावा, असे आवाहन फेडरेशनने सनी देओलला केले होते. भूषण कुमार आणि इम्तियाज अली यांनाही दिलजीतसोबत काम करू नये अशी मागणी फेडरेशनने केली होती. मात्र, या सर्व वादांना दिलजीतने स्वतःच पूर्णविराम दिला आहे.
दिलजीतनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला असून यात तो आर्मी ऑफिसरच्या लूकमध्ये आहे. हा व्हिडीओ 'बॉर्डर २'च्या शूटिंग दरम्यानचा दिसून येतोय. या व्हिडीओच्या बॅकग्राउंडमध्ये १९९७च्या 'बॉर्डर' चित्रपटातील 'घर कब आओगे' हे गाणं वाजत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दिलजीत चाहत्यांनी या व्हिडीओवर आनंद व्यक्त करत म्हटलं, "दिलजीत परत आला आहे! त्याला बॅन करणाऱ्यांनी आता गप्प बसावं". तर अनेकांना दिलजीतला 'बॉर्डर २'मध्ये कायम ठेवणं पटलेलं नाही.