अभिनेते आणि अभिनेत्रींमधील मानधनात समानता (equality) नाही. अनेकदा अभिनेत्यांना अभिनेत्रींपेक्षा जास्त मानधन दिलं जातं. आजच्या काळात नायिकांचे महत्व वाढले असले तरी त्यांचे मानधन वाढलेले नाही. आजही अनेक अभिनेत्री नायकांच्या तुलनेत कमी फी मिळाल्याने नाराजी व्यक्त करतात. अभिनेत्रीवामिका गब्बीनेही (Wamiqa Gabbi) नुकताच याबाबत प्रश्न उपस्थित केला.
वामिका गब्बी हिने पंजाबी चित्रपटसृष्टीनंतर आता बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे. आपल्या दमदार अभिनयासह सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. २००७ मध्ये करीना कपूर आणि शाहिद कपूर यांच्या 'जब वी मेट' या चित्रपटातून पदार्पण करणारी वामिका सध्या तिच्या चित्रपट 'भूल चूक माफ' मुळे प्रसिद्धीझोतात आली आहे. या चित्रपटात वामिका बॉलिवूड अभिनेता राजकुमार रावसोबत (Rajkumar Rao) स्क्रीन शेअर केली आहे. नुकतंच झुमला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिनं अभिनेते आणि अभिनेत्रींमधील मानधनातील तफावत या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
वामिका म्हणाली, "हे खरं आहे की पगारात असमानता अस्तित्वात आहे, पण मला ते फारसं त्रास देत नाही. मात्र, ही भावना असते की तुम्ही एक स्त्री आहात म्हणून तुम्हाला कमी पैसे दिले जातात — आणि नेमकं तसंच घडतं. असं म्हणतात की पुरुष अभिनेता जास्त प्रेक्षकांना खेचतो, पण तुम्ही नायिका नसताना चित्रपट बनवूच शकत नाही. मला या मागचं तर्कच पटत नाही. अनेक वेळा असं होतं की एखाद्या नायकाला मोठी रक्कम दिली जाते, पण तरीही चित्रपट चालत नाही. मग त्याच्या फीवर परिणाम का होत नाही?, असा सवाल तिनं केला.
वामिका गब्बी पुढे म्हणाली, ""मी तो पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधू इच्छिते. मी हे सर्जनशील पद्धतीने करू इच्छिते, जिथे मला आनंदही मिळेल आणि माझ्या पद्धतीने पगारातील हा फरक कमी करता येईल. मी या गोष्टीचा इन्कार करू शकत नाही की मानधनात अजूनही असमानता आहे. कोणतीही 'अभिनेता' असेलली फिल्म अभिनेत्री असल्याशिवाय चालूच शकत नाही".